पालिकेच्या तपासणी शिबिरांबद्दल शंकांचा “संसर्ग’
संशयिताच्या आईने खडसावताच पथक फिरकले नाही
पालिका खोटारडेपणा करत असल्याचा गंभीर आरोप
– सागर येवले
पुणे – महापालिकेच्या शिबिरामध्ये घेतलेल्या स्वॅबचा अहवाल आला अन् कधीही घराबाहेर न पडलेला 13 वर्षीय मुलगा करोना “पॉझिटिव्ह’ निघाला. त्यावेळी त्याच्या आईने दुसऱ्या दिवशी खासगी रुग्णालयात करोना टेस्ट केली असता त्यावेळी अहवाल “निगेटिव्ह’ आला. यानंतर पालिकेच्या वैद्यकीय पथकाचा फोन आला. त्यावेळी संबंधित आईने खडसावताच हे पथक फिरकलेही नाही. ही धक्कादायक घटना शहरातील एका वस्तीभागात घडली आहे.
करोना संसर्ग रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने या परिसरात नागरिकांची आरोग्य तपासणी आणि स्वॅब घेतले जात आहे. अहवाल पॉझिटिव्ह आलेल्यांना रुग्णालयात दाखल करून, संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाइन केले जात आहे. त्यानुसार एका वस्तीभागात आठ दिवसांपासून तपासणी शिबिर सुरू असून, तेथील धक्कादायक प्रकार नागरिकांनी “प्रभात’कडे कथन केला.
बुधवारी (दि.17) एकाच कुटुंबातील सहा व्यक्तींचे स्वॅब घेतले. शुक्रवारी (दि.19) अहवाल येताच महापालिकेने या कुटुंबाला फोन करून “तुमच्या मुलाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून, आम्ही त्याला नेण्यासाठी येत आहे,’ असे सांगताच आईने ठाम नकार देत, “माझ्या मुलाला कोणतीही लक्षणे नाहीत. त्याला घरातच क्वारंटाइन करते,’ असे सांगितले. दुसऱ्या दिवशी खासगी रुग्णालयात स्वॅब तपासणी केली असता, अहवाल निगेटिव्ह आला. यावर महापालिका आणि पोलिसांनी फोन केला. त्यावर “मुलाची आताच तपासणी केली. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला. तुमचा हा खोटारडेपणा ओरडून सांगणार’ असे आईने खडसावताच पुन्हा कोणाचेही फोन तर सोडाच, पण तपासणीसाठी गाडीही आली नाही.
नागरिकांचे रुदन…
करोना अहवाल पॉझिटिव्ह आला, असे सांगून एका व्यक्तीला रुग्णवाहिकेमधून बालेवाडी येथे नेले. सकाळी 10 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्यांना रुग्णवाहितेच बसवून ठेवले. त्यानंतर तेथील डॉक्टरांनी “अहो तुमचा नाही, तुमच्या पत्नीचा अहवाल पॉझिटिव्ह आहे,’ असे सांगून पुन्हा घरी पाठवले आणि महिलेला घेऊन गेले.
काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाले. त्यामुळे मुलांचा सांभाळ करत कुटुंबाचा गाडा चालवणाऱ्या महिलेला करोना झाल्यामुळे घेऊन गेले. मात्र, तिच्या त्या लहान मुलांनी काय करायचे? या मुलांचा सांभाळ शेजारचेच करत आहेत.
क्वारंटाइन सेंटरमधील एका महिलेचा रक्तदाब वाढला आणि ती बेशुद्ध पडली. त्यांची करोना तपासणी केली, तर त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, त्यावेळी बिलाचा प्रश्न उद्भवला असता, रुग्णालयाने “आयसीयू नाही तर किमान औषधाचे पैसे भरावे,’ असे सांगण्यात आले. “आम्ही गरीब लोक कोठून पैसे भरणार’ असा प्रश्न या महिलेने उपस्थित केला.