नवी दिल्ली – कोरोना 11 मार्चपर्यंत एक स्थानिक आजार बनेल, असे मत भारतीय वैद्यक संशोधन परिषदेच्या साथरोग विभागाचे प्रमुख डॉ. समीरन पांडा यांनी व्यक्त केले.जर आम्ही आपली शस्त्रे खाली ठेवली नाहीत आणि करोना विषाणूंची नवी उत्परावर्तीत आवृत्ती आली नाही तर कोविड 11 मार्च पर्यंत स्थानिक आजार बनेल. जरी सध्या आढळणाऱ्या ओमायक्रॉन या आवृत्तीची जागा डेल्टाने घेतली तरी हा एक स्थानिक आजार बनण्याची शक्यता आहे, असे डॉ. पांडे म्हणाले.
सध्या सुरू असणारी तिसरी किंवा ओमायक्रॉनची लाट ओसरायला आमच्या गणितीय पध्दतीनुसार किमान तीन महिने लागतील. ही लाट 11 डिसेंबरला सुरू झाली होती, असे त्यांनी स्पष्ट केले. 11 मार्चनंतर आपल्याला काही दिलासा मिळण्यास सुरवात होईल. मात्र, दिल्ली आणि मुंबईत रुग्णसंख्या घटत आहे. तेथे पिक येऊन गेला आहे, हे म्हणण्यासाठी आपल्याला आणखी दोन ते तीन आठवड्याची वाट पहायला लागेल. या क्षणाला आपण मुंबई आणि दिल्लीत रुग्णसंख्या किंवा संसर्ग दर कमी होत असल्याचे ठामपणे म्हणू शकणार नाही, असेही डॉ. पांडा यांनी स्पष्ट केले.
दिल्ली आणि मुंबईत ओमायक्रॉन आणि डेल्टा यांचे प्रमाण साधारणत: 80-20 आहे. अशी पुस्तीही त्यांनी जोडली. आम्ही राज्यांना चाचण्या कमी करण्यास सांगितले नाही. आम्ही अधिक दिशादर्शक आणि उद्दिष्टीत चाचण्या अधिकाधिक करण्याचे आवाहन आम्ही केले आहे. ही साथ आपले स्वरूप बदलत आहे त्यामुळे चाचणी आणि त्याच्या व्यवस्थापनाचे स्वरूपही बदलावे लागेल.स्थानिक भाषेत आचारसंहिता प्रकाशीत करणे वगैरे मार्ग अवलंबावे लागतील असे त्यांनी सांगितले.