नाशिक – राज्यात करोना रूग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. नाशिक, मालेगाव शहरात देखील नवीन करोना रूग्णांमध्ये वाढ होतेय. रविवारी नाशिक जिल्ह्यात 654 रूग्ण करोना पाॅझिटिव्ह आढळले आहे, तर सोमवारी 675 रूग्ण आढळले. त्यामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून करोनाचा संसर्ग रोखण्यासाठी नाशिक, आणि मालेगाव शहरात अंशत: लाॅकडाऊनचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील शाळा, काॅलेज, क्लासेस पूर्णत: बंद करण्यात आले आहेत. यासंदर्भात नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी माहिती दिलीय.
नाशिक जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार, नाशिक, निफाड, मालेगाव, नांदगावमधील सर्व शाळा, महाविद्यालये, इतर शिक्षण संस्था पूर्णत: बंद राहतील. तसेच 15 तारखेनंतर शहरात लग्न सोहळ्यांना परवानगी नसणार आहे. शहर आणि जिल्ह्यातील दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत सुरू राहतील. बार आणि अन्य खाद्यपदार्थांचे हाॅटेल्स 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार आहे. धार्मिक, राजकीय आणि सामाजिक समारंभांवर पूर्णत: बंदी असणार आहे.
औरंगाबादमध्ये अंशत: लाॅकडाऊन –
करोनाचा वाढता धोका लक्षात घेता औरंगाबाद प्रशासनानेही 11 मार्च ते 4 एप्रिलदरम्यान अशत: लाॅकडाऊनचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार लाॅकडाऊनदरम्यान, सर्वाजनिक सभा, साप्ताहिक बाजार, खेळ स्पर्धा, शाळा, काॅलेज बंद असणार आहे. तसेच लग्न सोहळ्यांनाही परवानगी नाकारण्यात आली आहे.
मुंबईत मुख्यमंत्र्यांचे लाॅकडाऊनचे संकेत –
मुंबईतही करोना रूग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. दररोजची संख्या आता हजार पार आहे. त्यामुळे अशीच परिस्थीती राहिल्यास लाॅकडाऊनशिवाय पर्याय नाही. असे संकेत पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत.