नवी दिल्ली – गेल्या दोन वर्षात करोनामुळे 1 लाख 50 हजार मुले निराधार झाल्याची आकडेवारी समोर आली आहे. ही राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोगाने (एनसीपीसीआर) सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये दिली आहे. 1 एप्रिल 2020 पासून 11 जानेवारी 2022 पर्यंत देशातील 1 लाख 47 हजार मुले निराधार झाली आहेत.
एनसीपीसीआरने दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रामध्ये करोना कालावधीमध्ये 11 जानेवारीपर्यंत 10 हजार 94 मुलं पूर्णपणे अनाथ झाल्याचे सांगितले आहे. तर 1 लाख 36 हजार 910 अशी मुलं आहेत ज्यांच्या आईचे किंवा वडीलांचे या कालावधीमध्ये निधन झाले. तसेच 488 मुले पालकांनी सोडून दिलेली आढळून आली.
अनाथ झालेल्यांपैकी 59 हजार 10 मुले अशी आहेत ज्यांचे वय 8 ते 13 वर्षांदरम्यान आहे. 26 हजार 89 मुले अशी आहेत जी वयाच्या चार ते सात वर्षांदरम्यान अनाथ झालीय. तर 14 ते 15 वर्ष वयोगटामधील 22 हजार 763 मुलांनी आपल्या पालकांपैकी एकाला गमावले आहे.
आयोगाच्या आकडेवारीनुसार 1 लाख 25 हजार 205 मुले आपल्या पालकांपैकी एका पालकासोबतच सध्या राहत आहे. 11 हजार 272 मुले पालकांपैकी एक जण वारल्यानंतर आपल्या कुटुंबियांसोबत राहत आहेत. तर 1 हजार 529 मुले बालसुधारणा गृहांमध्ये राहत आहेत.
बहुतांश लोकांच्या उत्पन्नात घट
करोनाच्या सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये 99 टक्के लोकांचे उत्पन्न घसरले. यामुळे 16 कोटींहून अधिक लोक गरिबीच्या गर्तेत ढकलले गेले. आगामी बराच काळ करोनाच्या लोकांच्या जिवनमानावर नकारात्मक परिणमा होणार असल्याची माहीती एका अभ्यास अहवालातूनू पुडे आली आहे.
जगातील 10 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींचे उत्पन्न दुपटीहून अधिक वाढून 1.5 ट्रिलियन अमेरिकी डॉलपर्यंत पोहोचले. उत्पन्नवाढीचा हा दर दररोज 1.3 अब्ज डॉलर इतका होता.
ही असमानता दररोज किमान 21 हजार लोकांच्या किंवा दर चार सेकंदांना एका व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत ठरत असल्याचे ऑक्सफॅमच्या अहवालात म्हटले आहे. जगातील अब्जाधीशांची संपत्ती गेल्या 14 वर्षांत वाढली नव्हती, इतकी करोना महासाथ सुरू झाल्यापासून वाढली आहे.
महासाथीच्या पहिल्या दोन वर्षांमध्ये जगातील 10 सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींच्या उत्पन्नात सेकंदाला 15 हजार डॉलर वाढ झाली. या लोकांजवळ सध्या सर्वाधिक 3.1 अब्ज लोकांपेक्षा सहापट अधिक संपत्ती आहे, असे ऑक्सफॅमचे आंतरराष्ट्रीय कार्यकारी संचालक गॅब्रिएल बुचर यांनी सांगितले.