नवी दिल्ली – करोनाचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशाच्या राजधानीत पुन्हा लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दिल्ली सहा दिवस लॉक राहील. अर्थात, लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
दिल्लीत करोनाची चौथी लाट आली आहे. त्यामुळे मागील काही दिवसांपासून तेथील करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. दिल्लीत रविवारी उच्चांकी 25 हजार 462 नव्या बाधितांची नोंद झाली. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लॉकडाऊनची घोषणा केली. सोमवारी रात्री 10 ते 26 एप्रिलच्या सकाळी 5 वाजेपर्यंत दिल्लीत लॉकडाऊन असेल.
दिल्लीत औषधे, ऑक्सिजन, रुग्णालयांचे बेड आणि आयसीयूंची मोठी कमतरता भासत आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आला आहे. कुठल्याही व्यवस्थेला मर्यादा असतात. त्यामुळे आरोग्य व्यवस्था कोलमडून पडू नये, यासाठी नाईलाजाने लॉकडाऊनचे पाऊल उचलावे लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.
लॉकडाऊनमुळे गरीब, रोजंदारीवर काम करणाऱ्या कामगारांचे सर्वाधिक हाल होतात. त्यामुळे तो निर्णय घेणे सोपे नव्हते, अशी प्रांजळ भूमिका केजरीवाल यांनी ऑनलाइन पत्रकार परिषदेत मांडली. स्थलांतरितांनी दिल्ली सोडून जाऊ नये. आप सरकार त्यांची सर्वतोपरी काळजी घेईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.