कविता शेटे
सांगली – जिल्ह्यातील शिराळा, चांदोली भागात मोठ्या प्रमाणात रानमेवा बहरला आहे. या भागातील करवंदाच्या जाळ्या लक्ष वेधून घेत आहेत. दरवर्षी उन्हाळ्यातील एप्रिल- मे महिन्यात ही सर्व फळे बहरतात व बाजारात विक्रीसाठी आणली जातात. परंतु, यावर्षी करोनाच्या पार्श्वभूमीवर वाढत असणाऱ्या लॉकडाऊनमुळे रानमेवा उपेक्षित राहिला आहे. महामंडळाच्या बसेस, खासगी वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने या रानमेव्यापासून मिळणारे लाखोचे उत्पन्न बुडाले आहे. लॉकडाऊन आणखी वाढल्यास हा रानमेवा जंगलातच खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.
सांगली जिल्ह्यातील पश्चिम भाग हा सदाहरित वनांचा प्रदेश आहे. येथील शिराळा, चांदोली हा भाग चांदोली राष्ट्रीय उद्यान व सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये समाविष्ट आहे. पश्चिम घाटाचा समावेश ‘वर्ल्ड हेरिटेज साईट’ मध्ये करण्यात आला आहे. हा भाग जैवविविधतेने नटलेला आहे. सांगली जिल्ह्यातील वनक्षेत्र अवघे सहा टक्के आहे. या वनक्षेत्राच्या सुमारे एक चतुर्थांश वनक्षेत्र एकट्या शिराळा तालुक्यात आहे.
वसंत ऋतूची सुरुवात झाल्यानंतर लगेचच रानमेवा बहरायला सुरुवात होते. यामध्ये आंबा, जांभूळ, चिंच, तोरणे, फणस, बिबवी, करवंद, मलबेरी( तुती) यांचा समावेश होतो. वारणा खोऱ्यात ही फळे मोठ्या प्रमाणात पिकतात. चैत्र महिन्याच्या सुरुवातीला या सर्वच फळांना पाड लागतात. ही फळे अत्यंत गुणकारी व चवदार असतात. उन्हाळ्यात आंबा, कलिंगड, द्राक्ष खाण्याची जेवढी उत्सुकता असते तितकीच हा रानमेवा चाखण्याची आस लोकांना लागलेली असते. आडरानात कुठेही कसाही उगवणारा हा रानमेवा टोपल्याटोपल्यात भरुन बाजारात आणला की आपल्यालाही भुरळ पडल्याशिवाय राहात नाही.
दरवर्षी जिल्ह्यातील रानमेव्याच्या विक्रीतून लाखो रुपयांची उलाढाल होत असे. परंतु, यावर्षी करोनामुळे वाहतुकीच्या सर्व सोयीसुविधा बंद झाल्या. त्यामुळे जंगलात असणारा रानमेवा मुबलक असूनही लोकांपर्यंत पोचवता येत नाही अशी स्थिती निर्माण झाली आहे. हातावर पोट असणाऱ्या महिला व त्यांच्या कुटुंबातील सदस्य पहाटे लवकर उठून हा रानमेवा जंगलातून आणतात. यानंतर रानमेव्याची विक्री ग्रामीण भागातील महिलांकडून केली जाते.
हंगामी रोजगारातून त्यांच्या कुटुंबाला हातभार लागतो. या महिला जिल्ह्यातील शहरी भागात करवंदे, जांभळे, तोरणे फणस विक्रीसाठी घेऊन जातात. यातून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालण्यास मदत होते व एक प्रकारे त्यांना रोजगाराचे साधन मिळते. लॉकडाऊनमुळे वाहतूक पूर्ण थांबल्याने हा रोजगार पूर्ण बुडाला आहे.