मुंबई : कोरोना बाधितांच्या संक्रमणाचा वेग राज्यात कमी झाला आहे. शुक्रवारी राज्यात कोरोनाबाधीत 118 नवीन रुग्णांची नोंद झाली. यामुळे एकूण रुग्ण संख्या 3320 झाली आहे. शुक्रवारी दिवसभरात 31 रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 331 रुग्ण बरे झाले आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. शुक्रवारपर्यंत पाठविण्यात आलेल्या 61 हजार 740 नमुन्यांपैकी 56 हजार 964 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत. तर 3320 जण पॉझिटिव्ह आले असल्याचीही माहिती यावेळी त्यांनी दिली.
सध्या राज्यात 74 हजार 587 लोक होम क्वॉरंटाईनमध्ये असून 6376 लोक संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत. आज राज्यात सात कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईचे पाच, पुण्यातील दोन जण आहेत. त्यापैकी पाच पुरुष तर दोन महिला आहेत.
शुक्रवारी झालेल्या सात मृत्यूपैकी सहाजण हे वय वर्षे 40 ते 60 या वयोगटातील आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या सात जणांपैकी सात रुग्णांमध्ये (71 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता 201 झाली आहे.