सरकारकडे मदतीची मागणी : मका, सोयाबीन उत्पादकांवरही परिणाम
पुणे – चिकन खाल्ल्यामुळे करोना व्हायरसचा संसर्ग होतो, अशा अफवा पसरल्यामुळे गेल्या महिनाभरात पोल्ट्री उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. सरकारने या उद्योगाला मदत जाहीर करण्याची गरज आहे, असे पोल्ट्री उद्योजकांची संघटना “एआयपीबीए’ या संघटनेने म्हटले आहे.
या उद्योगाचे फेब्रुवारीत 1,750 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. पोल्ट्रीचा उत्पादन खर्च सर्वसाधारणपणे 80 रुपये प्रति किलो आहे. सध्या मागणी नसल्यामुळे पोल्ट्रीचे दर 30 रुपये प्रति किलोपर्यंत कोसळले आहेत. या संघटनेचे अध्यक्ष बहादूर अली म्हणाले, “समाज माध्यमांवर चिकन खाल्ल्यामुळे करोना व्हायरस होतो, अशा अफवा पसरवल्या जात आहेत. त्यामुळे फारशी माहिती नसलेले काही ग्राहक चिकन विकत घेणे किंवा हॉटेलमध्ये जाऊन खाणे टाळत आहेत.’
जर अशा अफवा मार्चमध्येही सुरू राहिल्या तर या उद्योगाला 1,750 कोटी रुपयांचा फटका सहन करावा लागणार आहे. केवळ पोल्ट्री उद्योगावर त्याचा परिणाम होणार नाही, तर मका, सोयाबीन उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यावर परिणाम होणार आहे. गेल्या काही दिवसांमध्ये मक्याचे दर 25 रुपये प्रति किलो वरून 15 रुपये प्रति किलोपर्यंत कोसळले आहेत. या घडामोडीचा सरकारने सहानुभूतीपूर्वक विचार करावा. पोल्ट्री उद्योगाला आणि शेतकऱ्यांना खेळत्या भांडवलाची मदत करावी.
शेतकरी किंवा पोल्ट्री उद्योजकांकडून कर्ज परत होण्यात 90 दिवसांपेक्षा अधिक काळ लागला तर त्याला अनुत्पादक मालमत्ता समजून नये, अशा मागण्या पशुधन मंत्रालयाकडे करण्यात आल्या आहेत. शेतकरी आणि पोल्ट्री उद्योगाला व्याजदरात सवलत द्यावी. त्याचबरोबर सध्या घेतलेले कर्ज परत करण्यास 1 वर्षाचा कालावधी द्यावा. या उद्योगात 6 लाख शेतकरी काम करतात आणि या उद्योगाचे राष्ट्रीय उत्पन्नातील योगदान 1.2 लाख कोटी रुपये आहे.