नवी दिल्ली : उत्तर प्रदेशमधील मथुरामध्ये गाझियाबादमधील डासना मंदिराचे महंत नरसिम्हानंद यांनी पुन्हा एकदा एक वादग्रस्त वक्तव्य केले आहे. करोना साथीसंदर्भात भाष्य करताना करोना हे सरकारचं षडयंत्र असल्याचा दावा नरसिम्हानंद यांनी केला. एवढेच नाही तर त्यांनी भारतामध्ये मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हिंदूंच्या नाशाचे कारण ठरु शकते, त्यामुळे हिंदूंनी ५-६ मुलांना जन्म द्यावा असे धक्कादायक वक्तव्य केले आहे.
महंत नरसिम्हानंद एका कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी मथुरेत पोहचले होते. इथे त्यांनी अनेक संतांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी चर्चा केली. त्यावेळी त्यांनी करोनाच्या मुद्द्यावरुन सरकारवर टीका केली. “मास्क लावून तुम्हाला आजारी पाडले जात आहे. करोना हे सरकारचे खूप मोठे षडयंत्र आहे. मी स्वत: मास्कही लावत नाही आणि करोनालाही मानत नाही. ज्यांची रोगप्रतिकारशक्ती कमी आहे ते लोक मास्क लावतात,” असे महंत नरसिम्हानंद यांनी म्हटले आहे.
महंत नरसिम्हानंद यांनी मुस्लिमांची वाढती लोकसंख्या हा चिंतेचा विषय असल्याचे वक्तव्य केले. जिथे जिथे मुस्लिमांची लोकसंख्या वाढलीय तिथे ते इतरांना जिवंत सोडत नाहीत. लोकांनी हिंदू नेत्यांवर भरोसा ठेऊन नये, असेही महंत नरसिम्हानंद यांनी म्हटले आहे.
प्रत्येक हिंदूने कमीत कमी पाच ते सहा मुलांना जन्म दिला पाहिजे. ज्या पद्धतीने मुस्लिमांची लोकसंख्या वाढत आहे ते पाहता मोठं संकट येत आहे. प्रत्येक हिंदूने शस्त्रधारी होणं गरजेचं आहे, असेही महंत नरसिम्हानंद यांनी म्हटले आहे.