मुंबई: अचानक आलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने महाराष्ट्रात हाहाकार माजवला आहे. मात्र लवकरच ही लाट ओसरणार असल्याची मोठी दिलासादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, राज्यातील कोरोनाची दुसरी लाट मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पूर्णपणे ओसरेल, असे महत्त्वपूर्ण भाकीत टास्क फोर्समधील डॉक्टरांनी वर्तविले आहे.
दरम्यान, एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला राज्यभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढायला सुरुवात झाली होती. मात्र, या लाटेने उच्चांक गाठला असून आता रुग्णांची संख्या स्थिर होताना दिसत आहे. त्यामुळे 31 एप्रिलपासून राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरायला सुरुवात होईल. त्यानंतर आठवडाभराच्या कालावधीत नव्या रुग्णांची संख्या आणि मृत्यूदर दोन्हीही कमी होतील, असा टास्क फोर्समधील डॉक्टरांचा अंदाज आहे. तसेच लसीकणावर नियोजनबद्ध भर दिला पाहिजे, लसीकरण अत्यंत महत्त्वाचे असल्याचेही त्यांनी सांगितले.
कोरोना संसर्गाला आळा बसावा यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊनचा घेतलेला निर्णय योग्य ठरताना दिसत आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 48,700 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 524 रुग्णांचा मृत्यू झाला. तर 71,736 रुग्णांनी कोरोनावर मात केली. राज्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र दुसरीकडे कोरोनामुक्त होणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याचे दिसते.