मुंबई : राज्यात कोरोनाचे संकट पुन्हा एकदा डोके वर काढत आहे. त्यातच मुंबईत कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. दरदिवशी मुंबईत कोरोना रुग्णांचा आकडा वाढतच जात असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील वर्षी कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर मुंबईत आतापर्यंत सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्णांचा उच्चांक पाहायला मिळाला आहे. शुक्रवारी दिवसभरात मुंबईत तब्बल 3062 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. शहरात आतापर्यंत 3 लाख 55 हजार 897 रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत फेब्रुवारीच्या मध्यानंतर दिवसेंदिवस आकडेवारी वाढत आहे. बुधवारी 2377 रुग्णांची नोंद झाली होती. काल (18 मार्च) ही संख्या तब्बल 500 रुग्णांनी वाढून 2877 वर पोहोचली आहे. ही आकडेवारी आतापर्यंतची सर्वाधिक असल्याची नोंद झाली होती. परंतु आज रुग्णसंख्येने उच्चांक गाठला, एका दिवसातील रुग्णसंख्या तीन हजारांच्या पार पोहोचली. आज 3062 नवे रुग्ण आढळले आहेत.
मुंबईत मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाने शिरकाव केल्यानंतर काही दिवसांतच कोरोना रुग्णांच्या संख्येच झपाट्याने वाढ पाहायला मिळाली. एप्रिल मे, जूननंतर कोरोनाने कहर केला होता. त्यानंतर 7 ऑक्टोबरला ही रुग्णसंख्या 2848 पर्यंत पोहोचली होती. ही आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या होती. मात्र त्यानंतर मुंबई महापालिकेच्या प्रभावी उपाययोजना आणि कठोर अंमलबजावणीमुळे कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली.
मग अनलॉक प्रक्रिया टप्प्या-टप्प्याने शिथील केल्याने सार्वजनिक ठिकाणी असलेले व्यवहार पुन्हा सुरु झाले. मात्र कोरोनाचा धोका कमी कायम असल्याने कोरोना नियमाचे पालन करणे बंधनकारक होते. मात्र वाढलेली गर्दी आणि लोकांनी कोरोना नियमाचे पालन न केल्याने ही संख्या पुन्हा वाढली आहे.