नवी दिल्ली – जगभरात गेल्या दोन वर्षापासून करोना महामारीने थैमान घातले आहे. भारतात सुद्दा करोनाने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. पहिली लाट, दुसरी लाट आणि आता तिसऱ्या लाटेचा धोका वर्तविला जात आहे. असे असताना तज्ज्ञांनी करोना लाटांत मोजण्याचे सोडून द्या भविष्यात येणाऱ्या नवीन प्रकारच्या धोक्यांवर लक्ष द्या असा इशारा देण्यात आला आहे.
तज्ज्ञांच्यामते आता आपल्याला करोनाच्या लाटांबाबत बोलणे, चर्चा करणे थांबवायला हवे. यापुढे भविष्यात येणाऱ्या नवीन प्रकारच्या धोक्यांवर लक्ष देणे गरजेचे आहे. ज्याचे स्वरुप करोनापेक्षा वेगळे असू शकेल. या धोक्यांना सामोरे जाण्याची पद्धतही वेगळी असेल.
ज्या देशात करोनाचे रुग्ण कमी झाले तिथे सावधगिरीदेखील कमी झाली आणि करोना पुन्हा हात पाय पसरू लागला होता. ब्रिटन आणि अमेरिकेत कोरोनाची लाट गेल्यावर बाजार आणि शाळा उघडल्या आणि पुन्हा कोरोना फैलावला. असे नुकसान करोना केस आणि मृत्यूंचा आकडा पाहून लाटांची मोजणी करण्याचे झाले आहे.
भारतीय व्हायरॉलॉजिस्ट डॉ. गगनदीप कांग म्हणतात की, तिसरी लाट जर आली तर ती दुसऱ्या लाटेसारखीच ताकदवर असेल हे म्हणणे ठीक नाही. तिसरी लाट आधीसारखी न होता देशातील वेगवेगळ्या भागांत सीमित राहू शकते. भविष्यात कोरोनाची लाट येणे न येणे हे लोकांच्या वागण्यावर अवलंबून असणार आहे. सणासुदीला जेवढे नियंत्रण ठेवता येईल त्यावर अवलंबून असेल.
दरम्यान, कालच करोना विषाणू महामारी राहिला नसल्याचे दिल्लीच्या एम्सचे संचालक डॉक्टर रणदीप गुलेरिया यांनी सांगितले होते. करोना व्हायरस आता महामारी राहिला नाही. पण जोपर्यंत देशातील प्रत्येक नागरिकाचे लसीकरण होत नाही तोपर्यंत अत्यंत सावध आणि सतर्क असणे गरजेचं असल्याचे त्यांनी सांगितले आहे.