पाटणा -बिहारमध्येही करोना इफेक्ट जाणवू लागला आहे. त्यातून त्या राज्यातील जेडीयू या सत्तारूढ पक्षाच्या आणि प्रमुख विरोधी पक्ष असणाऱ्या राजदच्या मुख्यालयांना टाळे ठोकण्यात आले आहे.
देशातील बहुतांश राज्यांप्रमाणे बिहारमध्येही करोनाची दुसरी लाट फैलावली आहे. मागील काही दिवसांपासून बिहारमधील करोनाबाधितांची संख्या लक्षणीय वाढत आहे. त्यामुळे धास्तीने किंवा सावधगिरीचा उपाय म्हणून राजकीय पक्षांनीही पावले उचलण्यास सुरुवात केली आहे.
जेडीयूने 15 ते 20 एप्रिल या कालावधीत येथील मुख्यालय बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तर, राजदने पुढील आदेशापर्यंत मुख्यालय बंद राहणार असल्याचे जाहीर केले. दोन्ही पक्षांनी तशा आशयाच्या सूचना आपापल्या मुख्यालयांवर लावल्या आहेत. भाजप आणि कॉंग्रेसची मुख्यालये सुरू आहेत. मात्र, करोनाविषयक निर्बंधांचे पालन करूनच कामकाज केले जात आहे. अर्थात, त्या पक्षांची मुख्यालयेही आगामी काळात बंद होण्याचे संकेत मिळत आहेत. बिहारमधील काही नेत्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही करोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.