नवी दिल्ली : जगभरात थैमान घातलेल्या कोरोनाच्या देशातील वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने अनेक देशातील नागरिकांचा व्हिसा रद्द करण्याचा निर्णय घेतलाय. 15 एप्रिलपर्यंत परदेशी पर्यटकांचा व्हिसा रद्द करण्यात आला असून भारताचे दरवाजे त्यांच्यासाठी तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहेत. 13 मार्चला मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. परदेशातून येणाऱ्या नागरिकांमुळे देशातील कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, याची खबरदारी म्हणून केंद्र सरकारने हे महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, आंतरराष्ट्रीय संघटना याव्यतिरिक्त अन्य सर्व प्रकारचे व्हिसा रद्द करण्यात आले आहेत.
भारतीय वंशाच्या नागरिकांसाठी विना व्हिसा मिळणारी एन्ट्रीलाही या काळात स्थगित राहणार आहे. याशिवाय भारतीय नागरिकांनी अनावश्यक परदेशी यात्रा करु नये, अशा सूचना देखील सरकारकडून देण्यात आल्या आहेत. जे भारतीय परदेशातून मायदेशी परतणार आहेत त्यांना 14 दिवस निरिक्षणाखाली ठवण्यात येणार आहे. चीन, इटली, इराण, कोरिया, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनी या देशातून भारतात येणाऱ्या नागरिकांना 14 दिवस निरिक्षणाखाली रहावे लागेल, असे केंद्र सरकारने म्हटले आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने देखील कोरोना विषाणूने धोक्याची पातळी ओलांडली असल्याचे म्हटले आहे. कोरोना हे जागतिक संकट असल्याचेही घोषित करण्यात आले असून याकडे दुर्लक्ष करणे म्हणजे मृत्यूला निमंत्रण दिल्यासारखे असल्याचा उल्लेख या संघटनेन केला आहे. देशात आतापर्यंत 69 जणांना कोरोनाची लागण झाल्याची पुष्टी झाली आहे. दिवसेंदिवस हा आकडा वाढत असून राज्यात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा हा 11 वर पोहचला आहे.