नवी दिल्ली, दि. 25 – भारतात करोनाचा विस्फोट झाल्यामुळे त्याचा अर्थकारणावरही विपरीत परिणाम होत असून, गेल्या काही दिवसांत विदेशी गुंतवणूकदारांनी भारतीय मार्केटमधून आपली 7622 कोटी रुपयांची गुंतवणूक या एप्रिल महिन्यात काढून घेतल्याचे स्पष्ट झाले आहे. या संबंधात उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार एप्रिल महिन्यात आत्तापर्यंत एकूण 8674 कोटी रुपये विदेशी गुंतवणूकदारांनी काढून घेतले.
तथापि, त्यातील 1052 कोटी रुपयांची त्यांनी फेर गुंतवणूकही केल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे 1 ते 23 एप्रिल या अवधीत काढून घेण्यात आलेली एकूण रक्कम 7622 कोटी रुपये इतकी आहे. या आधीच्या तीन महिन्यांत म्हणजे जानेवारी ते मार्च या अवधीत विदेशी गुंतवणूकदारांचा भारतातील गुंतवणुकीचा ओघ चांगला राहिला होता.
आता पैसे काढून घेण्याकडे त्यांचा कल वाढू लागल्याचे संकेत मिळाले आहेत. शेअर बाजारातील तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार देशातील कोविडच्या दुसऱ्या लाटेचा अर्थकारणावरील नेमका परिणाम अजून मोजता आलेला नाही. पण हे अर्थकारण सुधारण्यास बराच कालावधी लागेल असे त्यांनी नमूद केले आहे. तथापि, कोविडची लाट जशी कमी होत जाईल तशी पुन्हा गुंतवणूक वाढू शकले, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली आहे.