सांगली जिल्ह्याचा मृत्यू दर चिंताजनक
इस्लामपूर (प्रतिनिधी) : देशात महाराष्ट्र कोरोनाचा हॉटस्पॉट आहे. तर राज्यात सांगली जिल्ह्याचा मृत्यू दर सर्वाधिक चिंताजनक आहे.लोकांना राजकारण नको आहे. सुविधांची गरज आहे. रुग्णांना अत्यावश्यक सोयी देण्यासाठी प्राधान्य द्यावे.लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वय साधत कोरोनाच्या संकटाला सामोरे जावे असे आवाहन माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केले.
इस्लामपूर येथील प्रकाश हाॅस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटरच्या कोविड सेंटरला भेट दिली. त्यांनतर ते पत्रकार परिषदेत ते बोलत होते. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी आमदार शिवाजीराव नाईक, विलासराव जगताप, नगराध्यक्ष निशिकांत पाटील उपस्थित होते.
ते म्हणाले,” येथे प्रशासनावर कोणाचाच वचक नाही हे दुर्दैवी आहे. कोरोनाचे संकट राजकारणाच्या पलीकडे आहे. विरोधी पक्ष म्हणून आम्ही सकारात्मक भूमिका घेतली आहे. कधीही टोकाची भूमिका घेतली नाही. सर्वांनी मिळून एकत्रितपणे या संकटाला सामोरे जाण्याची गरज आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या प्रमाणात व्यवस्था वाढताना दिसत नाही. जिथे गरज आहे तिथे बेड ची संख्या वाढवायला हवी. प्रकाश हाॅस्पिटलमध्ये १०० बेडलाच परवानगी आहे. इथं ६०० रुग्णांची व्यवस्था होवू शकते. ऑक्सिजन बेडची संख्या वाढवता येईल का ? यासाठी उद्या (ता.२९) जिल्हाधिकारी बैठकीत आढावा घेणार आहे.प्रसंगी याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधणार आहे.”
पालकमंत्र्यांचे नाव न घेता टीकास्त्र.!
जिल्ह्याच्या बैठकीत विधानपरिषदेच्या आमदारांना निमंत्रण देणे टाळले जाते. असे सत्ताधाऱ्यां कडून होत असेल तर दुर्दैवी आहे. सध्या कोरोनाच्या निमित्ताने राजकारण करण्याची वेळ नाही. लोकांना सोयी सुविधा देण्याची गरज आहे.ती ओळखा असा अप्रत्यक्षपणे पालकमंत्री जयंत पाटील यांचे नाव न घेता टोला हाणला.
ते म्हणाले,” राज्यात दररोज १५ हजार नवे रुग्ण वाढत आहेत. सरकारने टेस्टिंग सह ऑक्सिजन, व्हेंटीलेटरची व्यवस्था वाढवायला हवी. होम आयशोलेशनचे नियोजन हवे. जिथं रुग्णालयात व्यवस्था आहे तिथे नव्याने तातडीने परवानग्या देत सुविधा वाढवायला हव्यात. जनतेला त्रास झाला तर लोकप्रतिनिधी आक्रमक भूमिका घेणार हे निश्चितच.”
यावेळी सी.बी.पाटील, सत्यजित देशमुख, युवा नेते राहुल महाडिक, पृथ्वीराज पवार , वाळवा तालुका भाजपाचे माजी अध्यक्ष प्रसाद पाटील,महिला आघाडीच्या अध्यक्षा सुरेखाताई मटकरी,युवा मोर्चाचे माजी अध्यक्ष चंद्रकांत पाटील,भाजपाचे शहर अध्यक्ष अशोकराव खोत,जेष्ठ नेते मधुकर हुबाले,संघटन सरचिटणीस धैर्यशील मोरे,अजित पाटील,संदीप सावंत,दादासाहेब रसाळ,यदुराज थोरात,विश्वजीत पाटील,विक्रम शिंदे उपस्थित होते.