पुणे – करोनामध्ये कर्तव्य बजावताना संसर्ग होवून मृत्यू झालेल्या जिल्ह्यातील चार जणांच्या वारसांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची विमा रक्कम देण्यास मान्यता देण्यात आली. ग्रामविकास विभागांतर्गत ही रक्कम देण्यात येणार असून, लवकर वारसांच्या खात्यात जमा होईल, अशी माहिती जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद व पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी दिली.
करोना संकटकाळात ग्रामीण पातळीवरील सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी, मिनी अंगणवाडी कार्यकर्त्या, अंगणवाडी मदतनीस, आशा कार्यकर्त्या, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी, सीएससी कंपनीचे केंद्र चालक, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कार्यरत कंत्राटी पद्धतीवरील कर्मचारी, कामगार, जिल्हा परिषद कर्मचारी यांना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण देण्यात आले होते.
त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेमध्ये ऑक्टोबरमध्ये महिनाअखेरपर्यंत 18 जणांचा कर्तव्य बजावताना करोनाने मृत्यू झाला. त्यामध्ये पंचायत विभागातील चार जणांचा समावेश आहे. त्याबाबत राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला. दरम्यान, राज्यातील 17 अधिकारी, कर्मचाऱ्यांना राज्य शासनाने विम्याची मदत जाहीर केली आहे. त्यामध्ये पुणे जिल्ह्यातील चार जणांचा समावेश आहे.
रमेश महादेव गोळे, ग्रामपंचायत कर्मचारी, शिंदेवाडी, ता. भोर., बबन महादेव तरंगे, शिपाई कम क्लार्क, ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामपंचायत तरंगवाडी, ता. इंदापूर, प्रकाश मधुकर सोनवणे, ग्रामविकास अधिकारी, पंचायत समिती, ता. बारामती. आणि परशुराम दगडू बढे, ग्रामपंचायत कर्मचारी, आरोग्य विभाग, ग्रामपंचायत वाघोली, ता. हेवली असे मृत्यू झालेल्या चौघांची नावे आहेत.