नवी दिल्ली – मागील एक वर्षापासून थैमान घालणाऱ्या करोना संसर्गाची आणखी एक लाट आता जगभरात येण्याची शक्यता आहे. करोना संसर्गावर लस आली. मात्र तरी देखील करोना कमी होण्याची चिन्ह नाहीत. या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेनं सर्व देशांना महत्त्वपूर्ण इशारा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुखांनी म्हटलं की, लस घेतल्यानंतरही सावधगिरी बाळगावी.
करोना महामारीपासून अजूनही आपली सुटका झालेली नाही. सगळ्याच देशांना अधिक सर्तक राहावं लागणार आहे. याशिवाय तिसऱ्या किंवा चौथ्या लाटेचाही सामना करावा लागू शकतो, असं WHO च्या आपात्कालीन विभागाचे तज्ज्ञ माईक रेयान यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. तसेच करोना लसीच्या पुरवठ्यामुळे करोनाविरुद्धची लढाई जिंकण्याची आशा निर्माण झाली आहे, परंतु यामुळे करोनाच्या प्रसाराबाबत आणि नियमांबाबत निष्काळजीपणा करणं महागात पडू शकतं. ब्राझीलसह जगातील सर्व देशांनी यावेळी अतिरिक्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केलं.
दरम्यान ब्रिटन, ब्राझिल आणि दक्षिण आफ्रिकेतील कोविड १९ या नवीन स्ट्रेनची प्रकरणं समोर आली आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र, केरळ आणि तेलंगना राज्यांना निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचं समजतं. एकूणच लस घेतल्यानंतरही सावधगिरी बाळगावी, असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेनं केलं आहे.