संयुक्तराष्ट्रे: करोनुमळे जगाच्या अर्थव्यवस्थेचे नुकसान तब्बल 8.5 ट्रिलियनवर जाण्याचा धोका आहे असा इशारा संयुक्तराष्ट्रांचे सरचिटणीस ऍन्तेनिओ गुटेर्रेस यांनी दिला आहे. या अपरिमीत हानीमुळे जगापुढे भूक आणि दुष्काळाचे गंभीर संकट उभे राहणार असून त्याला जगाने एकत्रित प्रतिसाद न दिल्यास होणारे नुकसान हे ऐतिहासिक स्वरूपाचे असेल असा इशाराही त्यांनी दिला आहे.
त्यांनी म्हटले आहे की, गेल्या काही दशकात मानवाने विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड प्रगती करून जीवन सुखकारक करण्याचा प्रयत्न केला आहे. पण तरीही करोनाने आपल्या पुढे अत्यंत भीषण आव्हान निर्माण केले आहे. या आव्हानाला जगाने एकदिलाने आणि संघटीतपणे सामोरे जाण्याची गरज त्यांनी व्यक्त केली आहे. आर्थिक स्थिती आणि विकास विषयक एका बैठकीत बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले. ते म्हणाले की 60 कोटी लोक सध्याच्या परिस्थितीमुळे अत्यंतिक दारिद्य्राच्या स्थितीत जाणार आहेत.
जगातल्या जवळपास निम्म्या लोकसंख्येपुढे रोजगाराचा प्रश्न उभा राहणार आहे.1930 साली मोठ आर्थिक मंदी आली होती. त्यातून जगाचे मोठे नुकसान झाल्याचे दाखले आजही दिले जातात पण करोना महामारीने निर्माण होणारे नुकसान त्याच्या कित्तेकपट अधिक असेल हे आपण लक्षात घ्यायला हवे असे त्यांनी म्हटले आहे.
वाढती विषमता, वातावरणात होणारे बेभरवशी बदल, तकलादू आरोग्य व्यवस्था, अशा साऱ्या कारणातच आता करोनाची महामारी पसरली असल्याने जगभरासाठीच मोठी संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. जगाने आता दैनंदिन व्यवस्थेचा मार्गच बदलण्याची वेळ आली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. संयुक्तराष्ट्र सरचिटणीसांनी बोलावलेल्या या परिषदेला जवळपास 50 देशांचे राष्ट्रप्रमुख उपस्थित होते.