सातारा -करोनाचा प्रादुर्भावाची चाहूल लागल्यापासून मार्च ते आजअखेर सलग दोनशे दिवस म्हणजेच साधारण सात महिने जिल्हा परिषदेचा करोना नियंत्रण कक्ष विषाणूवरील नियंत्रणासाठी राबत आहे.
जिल्हाधिकारी शेखर सिंह, तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत तसेच सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभाग नियोजनबद्ध उपाययोजना राबवत आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये काटेकोर नियोजन करीत आहेत.
नियंत्रण कक्षामध्ये सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील, अधिकारी आणि कर्मचारी मार्च महिन्यापासून सर्व अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार परिस्थिती आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. या प्रयत्नांना चांगले यशही मिळत आहे. जिल्ह्याचा रुग्ण बरे होण्याचा दर साधारण 83 टक्क्यांवर पोहोचला आहे.
कार्यालयीन कामासोबतच सकारात्मक माहितीचा तसेच आयुष मंत्रालयाच्या सूचनांचा प्रसार करणे, विविध प्रकारची उपयुक्त माहिती जनतेपर्यंत पुस्तके,पत्रके आदींद्वारे पोहोचविण्याचे कार्य कक्षामार्फत सुरू आहे. कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या कर्मचारी आणि प्राध्यापकांचे यासाठी सहकार्य मिळत आहे. आरोग्यसेवक, आरोग्यसेविका, आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, कार्यालयीन कर्मचारी, प्राथमिक शिक्षक, ग्रामसेवक अशा सर्वांचीच लढाई करोना योद्ध्याप्रमाणेच आहे. नियंत्रण कक्षातील विविध जबाबदाऱ्या पार पाडण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील नव्या नियुक्त्यादेखील करण्यात आल्या असून त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे.
कॉन्टॅक्ट ट्रेसिंग तसेच विविध करोना केअर सेंटरमध्ये दाखल होणाऱ्या आणि डिस्चार्ज होणाऱ्या रुग्णांची नोंद घेणे, विविध पातळ्यांवर नागरिकांशी संवाद साधणे इत्यादी प्रकारचे रिपोर्टिंग सुरू आहे. क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा सर्वसाधारण रुग्णालयातील कर्मचारीदेखील यामध्ये राबत आहेत. “माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ उपक्रम नियोजनबद्धरित्या राबविला जात आहे.
यामध्ये आशा कार्यकर्ती, आरोग्य सेवक तसेच प्राथमिक शिक्षक या सर्वांचाच सहभाग आहे. रोज शेकडो नागरिकांना भेटून त्यांची वैद्यकीय तपासणी करून तसे रिपोर्टिंग वेळेवर केले जात आहे. करोना नियंत्रणासाठी या अभियानामुळे सुलभता येत आहे. कर्मवीर भाऊराव पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये नियंत्रण कक्षासाठी विशेष सोय केली असून सर्वच अधिकारी वारंवार भेटी देऊन कामकाजाची माहिती घेत आहेत.