नांदुर – दौंड तालुक्यातील पश्चिम भागामधील औद्योगिक वसाहतीमध्ये मंगळवारी १९ कामगार पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. मात्र, शासनाच्या दुर्लक्षपणामुळे या औद्योगिक वसाहतीमध्ये सावळा गोंधळ सुरु झाला आहे.
काही दिवसांपूर्वी येथील औद्योगिक वसाहतीमध्ये एक कामगार पॉझिटिव्ह सापडला होता. परंतु, या कंपनीने अन्य कामगारांची टेस्ट न केल्याने संख्या १९वर पोहचली. हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. अशातही शासकीय अधिकारी मात्र बघ्याच्या भूमिकेत आहेत का? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. यासंदर्भात अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता टोलवाटोलवीची उत्तरे देण्यात येतात. जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.
आकडा वाढतोय!
बाधित कर्मचाऱ्यांचा आकडा वाढत असून कंपनी अधिकृत माहिती देण्यास टाळाटाळ करत आहे. येथील भागात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. याठिकणी कामासाठी पुणे शहर, वारजे माळवाडी, सिंहगड, हडपसर, उरूळी कांचन तसेच ग्रामीण भागातूनही बरेच कामगार येतात. यामुळे हे कर्मचारी कोणत्या झोनमधून येतात? त्यांची करोना टेस्ट केली आहे का? येथे सोशल डिस्टंन्सिगचे पालन केले होते का? यांसारखे अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.
दरम्यान, सहजपुर व नांदुर भागात करोनाने अक्षरशः धुमाकूळ घातला असून येथे बाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्याचबरोबर बाहेरून येणारा कामगार वर्गामुळे गावकऱ्यांची चिंता वाढत आहे. या भागात संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. तर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या भागात योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणीही दोन्ही गावातील नागरिक करीत आहेत.
पश्चिम पट्यात शासकीय कर्मचाऱ्यांनी लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे. या भागात औद्योगिक वसाहत मोठ्या प्रमाणात आहे. कंपनीशी संपर्क केला तर फोन घेतला जात नाही. कंपनी अजून किती लोकांचे जीव घेणार असा प्रश्न पडला आहे.
– सुशांत दरेकर, पंचायत समिती सदस्य, दौंड