मुंबई – राज्यात दररोज करोना रुग्णांची संख्या ५० हजारांहून अधिकने वाढत आहे. त्यामुळे वैद्यकीय सुविधांचा तुटवडा निर्माण झाला असून अनेक ठिकाणी रुग्णांचा ऑक्सिजनविना जीव जात आहे. राज्यातील कारगृहानंतर आता करोनाने वृद्धाश्रमात शिरकाव केला आहे. नवी मुंबईतील एका वृद्धाश्रमाची स्थिती बिकट झाली असून आतापर्यंत दोन वृद्धांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात करोना रुग्णसंख्या कमी करण्यासाठी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. मात्र करोना रुग्णसंख्या अजुनही कमी होत नाहीये. करोनाच्या दुसऱ्या लाटेत कुटुंबच्या कुटुंब बाधित होत असून धोकाही वाढला आहे. तळोजा येथील वृद्धाश्रमातील ६१ पैकी ५६ जणांना करोनाची लागण झाली आहे. यापैकी १४ जणांची प्रकृती गंभीर आहे. आतापर्यंत दोन वृद्धांचा मृत्यू झाला आहे.
वृद्धश्रमातील गंभीर प्रकृती असलेल्या १४ जणांवर येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हे १४ वृद्ध सध्या ऑक्सिजन सपोर्टवर आहे. तर इतरांना वृद्धाश्रमातच विलीगीकरणात ठेवण्यात आलं आहे.