नवी दिल्ली: जगाला हैराण करून सोडणाऱ्या कोरोनाचा धोका लसीकरणामुळे काही प्रमाणात कमी होण्याच्या मार्गावर आहे. मात्र अजूनही कोरोना पूर्णपणे आटोक्यात आलेला नाही. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आपला तिसरा राष्ट्रीय सीरो आपला सर्व्हे पूर्ण केला आहे. या सर्व्हेमध्ये असे सांगण्यात आले आहे की देशातल्या 21.5 टक्के लोकसंख्येला कोरोना होऊन गेला आहे. येत्या काळात अजूनही मोठ्या लोकसंख्येवर हा धोका कायम असल्याचे या सर्व्हेच्या अहवालातून सांगण्यात आले आहे.
आयसीएमआरने आपला तिसरा सीरो सर्व्हे 7 डिसेंबर आणि 8 डिसेंबर रोजी केला होता. त्यामधून ही धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर जनरल डॉ. बलराम भार्गव यांनी याविषयी माहिती दिली. 28,589 लोकसंख्येपैकी 21.4 टक्के लोकांमध्ये कोरोनाची बाधा होऊन गेली आहे. त्यामध्ये ग्रामीण भागातील 19.1 टक्क्यांच्या तुलनेत शहरी झोपडपट्टीतील 31.7 टक्के लोकसंख्या आणि 26.2 टक्के इतर लोकसंख्येमध्ये कोरोनाचा प्रसार झाल्याचे समोर आले आहे असेही डॉ.भार्गव यांनी सांगितले.
60 वर्षावरील 23.4 टक्के लोकांना कोरोनाची बाधा होऊन गेली आहे तर 7,177 आरोग्य कर्मचाऱ्यांपैकी 25.7 टक्के कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे हा अहवाल सांगत आहे. राष्ट्रीय सीरो सर्व्हेच्या पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्याच्या दरम्यान 21 राज्यांतील 70 जिल्ह्यामधील 700 गावांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला. देशातील कोरोनाच्या परिस्थितीवर आरोग्य मंत्रालयाने एक निवेदन जाहीर केले आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलंय की भारतात कोरोनाचा क्युमुलेटिव्ह पॉझिटिव्ह दर हा 5.42 टक्के आहे. त्यामध्ये सातत्याने घसरण सुरु आहे असेही सांगण्यात येत आहे.
गेल्या आठवड्यात हा दर केवळ 1.82 टक्के इतका होता. गेल्या तीन आठवड्यात देशातील 47 जिल्ह्यांत कोरोनाची कोणतीही केस समोर आली नाही तर 251 जिल्ह्यांमध्ये कोणताही बळी गेला नाही. भारतात कोरोनाच्या लसीकरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली असून पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचाऱ्यांना ही लस देण्यात येत आहे. येत्या जुलै महिन्यापर्यंत 25 कोटी भारतीयांचे लसीकरण पूर्ण करण्याचे ध्येय असल्याचे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.