नवी दिल्ली: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. गेल्या 24 तासांत देशात आज पर्यंतची सर्वाधिक वाढ झाल्याचे 62,258 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यंदाच्या वर्षात एकाच दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत झालेली ही सर्वाधिक वाढ आहे. धक्कादायक गोष्ट म्हणजे यापैकी 60 टक्के म्हणजे 36,902 रुग्ण हे एकट्या महाराष्ट्रातील आहेत. ही आकडेवारी पकडून आता देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1 कोटी 19 लाख 08 हजार 910 इतकी झाली आहे.
ही देशासाठी आणि महाराष्ट्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये तर कोरोना रुग्णांची संख्या गेल्यावर्षीपेक्षा वेगाने वाढत आहे. गेल्यावर्षीच्या मार्च महिन्यात पिंपरी-चिंचवडमध्ये रुग्ण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण 6 ते 8 टक्के होते. पण यंदाच्या वर्षी मार्च महिन्यात हाच पॉझिटिव्हिटी रेट 40 टक्क्यांवर जाऊन पोहोचला आहे.
राज्यात काल 26 मार्चला दिवसभरात 36,902 नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण 17,019 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. कालची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत 23,000,56 रुग्ण कोरोनातून नुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 87.2 टक्क्यांवर आले आहे. काल दिवसभरात कोरोनामुळे एकूण 112 रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या 2.04 टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 36,37,735 वर पोहोचला आहे.
16 ऑक्टोबर 2020 नंतर आज सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. 16ऑक्टोबर 2020 मध्ये सर्वाधिक 63 हजार 371 रुग्ण आढळले होते. तसेच रिकव्हरी रेटमध्येही बदल पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात 112, पंजाबमध्ये 59, छत्तीसगडमध्ये 22, केरळमध्ये 14 आणि कर्नाटकात 13 रुग्णांच्या मृत्यूची नोंद करण्यात आलीय.