लोणी काळभोर -हवेली तालुक्यातील करोना बाधित ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा शनिवारी (दि.11) सायंकाळी पाच वाजेपर्यंत तब्बल 420 वर पोहोचला आहे. शनिवारी दिवसभरात तालुक्यातील आठ विविध ग्रामपंचायत हद्दीत 43 करोनाचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.
हवेली तालुक्यात बाधित ऍक्टिव्ह रुग्णांचा आकडा तब्बल 420 वर पोहोचला असल्याची माहिती हवेली पंचायत समितीचे आरोग्य अधिकारी डॉ. सचिन खरात यांनी दिली आहे. दिवसभरात उरुळी कांचन (4), डोणजे (1), मांगडेवाडी (11), देहू (9), लोणी काळभोर (4), किरकिटवाडी (1), खडकवासला (4) व नऱ्हे (9) या आठ ग्रामपंचायत हद्दीत 43 रुग्ण आढळून आल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली आहे.
हवेली तालुक्यात तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी आढळून आलेल्या रुग्णांची संख्या थोडीफार तरी कमी झाली आहे. हवेलीत बुधवारी 63 तर गुरुवारी व शुक्रवारी या दोन्ही दिवसांत 54 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले होते. तीन दिवसांच्या तुलनेत शनिवारी आलेली आकडेवाडी थोडाफार तरी दिलासा देणारी आहे.
करोनाला रोखण्यासाठी आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस दलासह ग्रामपंचायत प्रशासन लढाई लढत आहे. नागरिकांनीही करोनाला दूर ठेवण्यासाठी मास्क वापरून व गर्दीत शिरताना सोशल डिस्टन्सिंग ठेऊन प्रशासनाला साथ देण्याची गरज आहे.
दोन दिवसांत अडिचशे बेड उपलब्ध होणार
डॉ. सचिन खरात म्हणाले की, पूर्व हवेलीत दहा दिवसांपासून उरुळी कांचन, लोणी काळभोर, कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीत बाधित रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांना पुरेसे बेड उपलब्ध होत नसल्याने रुग्णांना लोणी काळभोरपासून पुणे शहरातील विविध रुग्णालयांचे दरवाजे ठोठवावे लागत होते.
यातून मार्ग काढण्यासाठी पूर्व हवेलीमधील विश्वराज हॉस्पिटल (लोणी काळभोर), प्रयागधाम हॉस्पिटल (प्रयागधाम), चिंतामणी हॉस्पिटल (कोरेगाव मूळ) या तीन खासगी रुग्णालयामधील अडिचशे बेड हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर यांनी दोन दिवसांपूर्वी आरोग्य विभागाला ताब्यात घेण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशानुसार पुढील दोन दिवसांत तीन खासगी रुग्णालयातील बेड उपलब्ध होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
विलगीकरणासाठी उरुळी कांचन आश्रमाची चाचपणी
पूर्व हवेलीमधील तीन रुग्णालयात अडीचशेहून अधिक बेड उपलब्ध होणार असले तरी, रुग्णवाढीचा वेग लक्षात घेता रुग्णांना व त्यांच्या संपर्कात आलेल्या नातेवाइकांना यापुढील काळात बेड कमी पडणार आहेत. यातून मार्ग काढण्यासाठी उरुळी कांचन व परिसरातील रुग्ण व त्यांच्या संपर्कात आलेल्या हायरिस्क नातेवाइकांच्या विलगीकरणासाठी उरुळी कांचन येथील येथील महात्मा गांधी निसर्गोपचार आश्रमाची चाचपणी महसूल व आरोग्य विभागाने सुरू केली आहे. आरोग्य विभागाच्या ताब्यात निसर्गोपचार आश्रम मिळाल्यास उरुळी कांचन परिसरातील दोनशेहून अधिक रुग्णांची सोय होऊ शकते. पुढील दोन दिवसांत महसूल व आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी आश्रमाची पाहणी करणार आहेत.