मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडी सरकारमधील घटक पक्षांचा समन्वय हा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या तीन घटक पक्षांमध्ये समन्वय आहे की नाही याबाबत माध्यमांमध्ये चर्चा रंगली असतानाच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन याच विषयावर गंभीर चर्चा केल्याचे समजते.
कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांना विश्वासात न घेता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे परस्पर काही एकतर्फी निर्णय घेत असल्याचा आक्षेप गेल्या काही दिवसांत घेतला जात आहे आणि हा आक्षेप घेण्याजोग्या काही घटनाही घडल्या आहेत.
राज्याच्या मुख्य सचिव पदावरून निवृत्त झालेले अजय मेहता यांची नियुक्ती उद्धव ठाकरे यांनी स्वतःचे वैयक्तिक सल्लागार म्हणून केली आहे हा सर्वात जास्त कळीचा मुद्दा ठरू पाहत आहे. कारण काही महिन्यांपूर्वी झालेल्या कॅबिनेट बैठकीमध्ये कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या मंत्र्यांनी अजय मेहता यांच्या कार्यशैलीवर आक्षेप घेतला होता आणि त्यांना बदलण्याची मागणी केली होती.
सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये राज्याच्या मुख्य सचिवपदी संजय कुमार यांची नियुक्ती करण्यात आली. त्याचवेळी उद्धव ठाकरे यांनी अजय मेहता यांना आपले वैयक्तिक सल्लागार म्हणून जबाबदारी दिली. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ज्या अधिकाऱ्यांबाबत नाराजी नोंदवली होती त्याच अधिकाऱ्याला उद्धव ठाकरे यांनी आपल्या विश्वासातील माणूस म्हणून नियुक्ती दिल्याने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस यांची नाराजी अधिकच वाढत आहे.
शरद पवार यांनी अत्यंत नेमक्या शब्दांमध्ये ही नाराजी आणि त्याचे संभाव्य परिणाम उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातल्याचे समजते. अजय मेहता यांच्या कार्यशैलीबद्दल अधिकाऱ्यांमध्ये ही नाराजी असल्याने आणि आता ते मुख्यमंत्र्यांचे प्रमुख सल्लागार झाल्याने त्यांनी जर अधिकाऱ्यांना आदेश किंवा सूचना दिल्या तर अधिकाऱ्यांमध्येही नाराजी वाढण्याचा धोका शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्या निदर्शनास आणून दिल्याचेही समजते.
उद्धव ठाकरे मंत्र्यांना विश्वासात न घेता प्रशासकीय अधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्या सल्ल्याने काम करतात, असा एक समज गेल्या काही महिन्यांमध्ये तयार झाला आहे. राज्याचे मंत्री हे नेहमीच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या वर असतात; पण उद्धव ठाकरे प्रशासकीय अधिकाऱ्यांना जादा महत्त्व देत आहेत, असाही आक्षेप घेतला जात आहे.
अजय मेहता यांच्या नियुक्तीमुळे जर प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये नाराजी अधिक प्रमाणात वाढली तर काही गुप्त गोष्टी विरोधी पक्षांपर्यंत पोचू शकतात, असा इशाराही शरद पवार यांनी उद्धव ठाकरे यांना दिला आहे. महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमध्ये समन्वय चांगला आहे, असे कितीही म्हटले जात असले तरी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जेव्हा सहकारी मंत्र्यांपेक्षा प्रशासकीय अधिकाऱ्यांवर जास्त अवलंबून राहतात तेव्हा हा समन्वय नाही, असाच अर्थ काढावा लागतो.
काही दिवसांपूर्वी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ मंत्र्यांनीही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आम्हाला विश्वासात घेत नसल्याची तक्रार केली होती. माजी मुख्यमंत्री आणि सध्या राज्य मंत्रिमंडळातील ज्येष्ठ सदस्य अशोक चव्हाण, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात या सर्वांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
खासदार आणि ज्येष्ठ पत्रकार संजय राऊत यांनी कॉंग्रेस नेत्यांच्या या नाराजीला “जुन्या खाटांची कुरकुर’ असे विशेषण बहाल केले होते, ते खरे असेल तर गेल्या काही दिवसांमध्ये या जुन्या खाटांची कुरकुर कमी करण्यात उद्धव ठाकरे यांना यश आलेले नाही, असेच म्हणावे लागते.
कारण ज्यांच्या पुढाकाराने आणि प्रयत्नाने आणि सहकार्याने उद्धव ठाकरे यांचे हे सरकार अस्तित्वात आले आहे त्या शरद पवार यांना उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन महाविकास आघाडीतील समन्वयाबाबत काही गोष्टी सांगाव्या लागतात, हे लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. करोना महासंकटाच्या पार्श्वभूमीवर राज्यात “मिशन बिगीन अगेन’ या योजनेखाली अनलॉकचा काळ सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील काही प्रमुख शहरांमध्ये लॉकडाऊनची घोषणा केली. याबाबतही संबंधित मंत्र्यांना काहीच कल्पना नव्हती, अशीही एक प्रमुख तक्रार आहे. या सर्व तक्रारींची गंभीर दखल उद्धव ठाकरे यांना घ्यावीच लागेल.
शरद पवार यांनी दिलेला सल्ला उद्धव ठाकरे यांनी संपूर्णपणे मानावा, असा सल्ला माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दिला आहे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांचा सल्ला मी पण योग्य ठिकाणी स्वीकारतो, असे त्यांनी म्हटले आहे. अर्थात, यामागे थोडेफार विरोधकांचे राजकारण आणि काहीसा उपरोध असला तरी उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या समन्वयाचा विषय अतिशय गांभीर्याने घेण्याची हीच वेळ आहे. जेव्हा महाविकास आघाडी सरकारची स्थापना झाली तेव्हा काही किमान समान कार्यक्रम तयार करण्यात आला होता.
शिवाय घटक पक्षांमधील समन्वयासाठी एक समिती स्थापन करण्याचाही विचार झाला होता; पण सध्या तरी तशी कोणतीही समिती अस्तित्वात असल्याचे दिसत नाही. म्हणून उद्धव ठाकरे यांनी त्याचाही प्राधान्याने विचार करायला हवा. कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना सरकार चालवण्याचा अधिक जास्त आणि अधिक चांगला अनुभव आहे.
प्रशासकीय अधिकाऱ्यांना कसे हाताळायचे याची त्यांना चांगलीच कल्पना आहे. प्रशासनावर चांगला वचक असेल तर सरकार चांगले चालवता येते, हे या नेत्यांनी दाखवून दिले आहे. म्हणूनच उद्धव ठाकरे जेव्हा जेव्हा जास्तीत जास्त विश्वास प्रशासकीय अधिकाऱ्यांवर दाखवतात तेव्हा ती गोष्ट कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना मान्य होण्यासारखे नाही. म्हणूनच सध्याच्या संकटाच्या कालावधीमध्ये उद्धव ठाकरे यांना सहकारी मंत्र्यांमधील समन्वय वाढविण्याकडे अधिक लक्ष द्यावे लागेल.
संजय राऊत यांच्या भाषेत जर खाटांची कुरकुर अद्यापही सुरू असेल तर ती कोणत्याही परिस्थितीत थांबवायलाच हवी, अन्यथा सरकार चालवणे अवघड होऊन जाईल.