कराड (प्रतिनिधी) –सातारा, सांगली, कोल्हापूरला गेल्या काही वर्षात महापूराचा तडाखा का बसत आहे. याचा अभ्यास होणे आवश्यक असून त्याची स्वतंत्र महापुर नियंत्रणासाठी समन्वय समिती आवश्यक असल्याचे मत खा. श्रीनिवास पाटील यांनी मांडले. यावेळी नुकसान टाळण्यासाठी कायस्वरूपीची उपायोजना शोधणे आवश्यक असल्याचे आ. पृथ्वीराज चव्हाण म्हटले आहे.
पूरपरिस्थिती बद्दल सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्याची आढावा बैठक सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. या बैठकीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, खा. श्रीनिवास पाटील, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराजे देसाई, राज्यमंत्री विश्वजित कदम, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
श्रीनिवास पाटील म्हणाले, कृष्णा व कोयना नदीच्या पाण्याचा वेगामुळे पंचगंगा नदीच्या पाण्यास अटका होत आहे. त्यामुळे यावर कसा मार्ग काढता येईल याचा विचार होणे आवश्यक आहे. तसेच धरणांची संख्या वाढवली जावी का? याचाही विचार करावा असे मत त्यांनी मांडले. दरम्यान, या बैठकीला सातारा, सांगली व कोल्हापूर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी उपस्थित होते.