शेवगाव – सर्वसामान्याच्या हिताच्या जपवणूकीसाठी सर्वांनी एकत्रीत येवून या लोकसभा निवडणूकीत बदल घडवण्याची आवश्यकता असून शरद पवार यांचे हात बळकट करण्यासाठी आघाडीचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांना साथ देण्याचे आवाहन बारामती अँग्रोचे अध्यक्ष रोहित पवार यांनी केले.
आ.जगताप यांच्या प्रचारार्थ पदयात्रेचे आयोजन करण्यात आले. ठिकठिकाणी झालेल्या बैठकीमध्ये पवार बोलत होते. यावेळी माजी आमदार नरेंद्र घुले, चंद्रशेखर घुले, जनशक्ती मंचचे ऍड. शिवाजी काकडे, जिल्हा परिषद सदस्या हर्षदा काकडे, सुवर्णा जगताप, योगिता राजळे, पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितीज घुले, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय कोळगे, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष अरुण पाटील लांडे, संजय फडके, संपत नेमाणे, राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस डॉ. मेधा कांबळे, जगन्नाथ गावडे, नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने पदयात्रेत सहभागी होते.
पवार म्हणाले,भाजप सरकारने शेतकऱ्यांची सपशेल फसवणुक केली आहे. शेतमालाला हमीभाव नाही, कर्जमाफी झाली नाही. भाजप सरकारने फक्त हुलकावण्या देत झुलवत ठेवले. 2014 मध्ये मोदींनी दिलेली आश्वासने प्रत्यक्षात उतरली नाहीत. परिणामी शेतकरी, व्यापारी, सर्वसामान्यांचा भ्रमनिरास झालेला आहे. क्रांती चौकातून पदयात्रेस सुरुवात झाली. यावेळी मतदारांच्या गाठीभेटी घेवून पवार यांनी आघाडीच्या उमेदवाराला आंबेडकर चौक, क्रांती चौक, शिवाजी चौक, खालसी वेस, नाईकवाडी मुहल्ला, जैन गल्ली, मोची गल्ली मार्गे आंबेडकर चौकापर्यंत पदयात्रा काढण्यात आली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गाडगे महाराजांच्या पुतळ्यास पवार यांनी पुष्पहार घातले. पवार यांचा शहरात ठिकठिकाणी ग्रामस्थांनी सत्कार केला. या रॅलीला शहरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.