पुणे – राज्यातील शाळांमध्ये राबविण्यात येत असलेल्या शालेय पोषण आहार योजनेंतर्गत कार्यरत स्वयंपाकी, मदतनीस यांचे मानधन आता दरमहा 10 तारखेपर्यंत थेट त्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे. यामुळे त्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शालेय पोषण आहार ही केंद्र शासन पुरस्कृत योजना आहे. या योजनेमार्फत शाळांमधील विद्यार्थ्यांना आहार पुरविण्यात येतो. यासाठी शाळांना निधीही पुरविण्यात येत असतो.
राज्यातील विविध जिल्ह्यांमधील स्वयंपाकी, मदतनीस हे शाळांमधून पोषण आहार शिजविणे, आहार वाटप करणे, परिसर स्वच्छ करणे व इतर अनुषंगिक कामे करतात. पोषण आहार योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमध्ये स्वयंपाकी, मदतनीस यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. त्यांना एप्रिल 2019 पासून दरमहा 1 हजार 500 रुपये एवढे मानधन अदा करण्याचा निर्णय शासनाच्या शालेय शिक्षण विभागाकडून घेण्यात आलेला आहे.
जिल्हास्तरावरून मानधन अदा करण्यासाठी वेळापत्रकच तयार करून देण्यात आले असून त्याप्रमाणे बॅंक खात्यात मानधन थेट जमा करण्याची दक्षता घ्यावी, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे. केंद्रप्रमुखांनी दरमहा 3 तारखेपर्यंत मानधनाची देयके तालुका कार्यालयास सादर करणे आवश्यक आहे. तालुका कार्यालयाकडून देयकांची तपासणी करून एकत्रित देयके जिल्हा परिषदेस बॅंक यादीसह सादर करण्यासाठी 5 तारखेपर्यंतची मुदत देण्यात आलेली आहे.
मागणीची शिक्षण संचालकांनी घेतली दखल
प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत स्वयंपाकी, मदतनीस यांना मानधन देण्यासाठी जिल्हा परिषदांना आगाऊ स्वरुपात निधी देण्यात येत असतो. मात्र, तरीही मानधन वेळेवर अदा केले जात नसल्याचे अनेकदा उघडकीस आले आहे. स्वयंपाकी, मदतनीस यांनी स्वत: व विविध संघटनांनी नियमितपणे मानधन मिळण्याबाबतची मागणी शिक्षण संचालक कार्यालयाकडे निवेदनाद्वारे, दूरध्वनीद्वारे केली होती. त्याची दखल घेत प्राथमिक शिक्षण संचालक दत्तात्रय जगताप यांनी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या शिक्षणाधिकाऱ्यांना आदेश बजाविले आहेत.