नवी दिल्ली – वायनाड या केरळमधील आपल्या मतदारसंघाच्या दौऱ्यावर गेलेले कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांच्या एका वक्तव्यावरून वाद निर्माण करण्यात आला आहे. अगोदरची पंधरा वर्षे आपण उत्तर प्रदेशातून लोकसभेवर गेलो. तेथे आपल्याला दुसऱ्या प्रकाराचे राजकारण पहायला मिळाले. पण केरळमध्ये येणे आपल्यासाठी आल्हाददायी होते. कारण येथील लोक मुदद्यांवर आधारित राजकारण करतात. त्यांचे राजकारण वरवरचे नसते तर ते विषयाच्या मुळाशी जातात असे राहुल म्हणाले होते.
त्यांच्या या विधानावरून वाद निर्माण केला जातो आहे.
राहुल गांधी यांचे हे विधान उत्तर भारतीयांचा अवमान असल्याचे भारतीय जनता पार्टीने म्हटले आहे. राहुल संधीसाधू असल्याचा आरोप करत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा म्हणाले की राहुल काही दिवसांपूर्वी इशान्य भारतात होते. तेव्हा त्यांनी देशाच्या पश्चिम भागावर टीका केली होती. आता ते दक्षिण भारतात असताना उत्तर भारतावर टीका करत आहेत. मात्र आता फूट पाडा आणि राज्य करा हे राजकारण चालणार नाही. लोकांनी असले राजकारण झिडकारले आहे. त्याचा नमूना गुजरातमध्ये पहायला मिळाला आहे.
राहुल यांच्यावर निशाणा साधताना मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले की, राहुल यांनी अगोदर उत्तर भारत कॉंग्रेसमुक्त केला. आता ते दक्षिण भारत कॉंग्रेसमुक्त करत आहेत. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत एक आहे. याच कॉंग्रेस पक्षाने धर्माच्या नावावर भारत आणि पाकिस्तान फाळणी केली.
आनंद शर्मा यांचा खुलासा
दरम्यान, राहुल यांच्या विधानाने कॉंग्रेस पक्ष बचावाच्या पवित्र्यात गेला आहे. याबाबत बोलताना पक्षाचे नेते आणि माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा म्हणाले की, राहुल यांनी कोणत्या तरी अनुभवाच्या आधारे ही टिप्पणी केली आहे. मात्र त्यात त्यांनी कोणत्या भागाचा अवमान केल्याचे आपल्याला वाटत नाही. पण यावर तेच स्पष्टीकरण देउ शकतात. कॉंग्रेसने धर्म, भाषा, क्षेत्र या आधारावर कधीच कोणती रेषा आखली नाही. आमच्यासाठी संपूर्ण देश एक आहे.