Savarkar Controversy – देशाच्या राजकारणात सध्या सावरकरांचे नाव चर्चेत आहे. राहुल गांधी व काँग्रेसने मोदी सरकारला हिंडेनबर्ग अहवालावरून घेरलं असतानाच आता सावरकरांचे नाव राजकारणाच्या केंद्रस्थानी आले आहे. याला निमित्त ठरलंय राहुल गांधी यांचं एक वक्तव्य. राहुल गांधी यांनी निलंबनाच्या कारवाईनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत, ‘माझे अडनाव गांधी आहे, माफी मागायला मी काही सावरकर नाही.’ असं म्हंटलं होत.
त्यांच्या याच वक्तव्याचा आधार घेत सत्ताधारी भाजप व मित्रपक्षांनी राहुल गांधी यांना घेरलं आहे. भाजप व मित्रपक्षांकडून सावरकर यांचे जोरदार समर्थन करण्यात येत असतानाच आता काँग्रेसनेही भाजपला खिंडीत पकडण्यासाठी डाव टाकला आहे.
काँग्रेस नेते पवन खेरा यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला असून सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याबाबत केलेले लिखाण तुम्हाला मान्य आहे का? असा थेट प्रश्न उपस्थित केला आहे. खेरा यांच्या प्रश्नामुळे काँग्रेस सावरकरांचा मुद्दा तापवणाऱ्या भाजपला खिंडीत गाठण्याच्या विचार करत असल्याचं दिसतंय.
काय म्हणाले पवन खेरा? | Savarkar Controversy
“भाजपाकडून सावरकरांचा मुद्दा देशातील ज्वलंत प्रश्नापासून जनतेचे लक्ष वळवण्यासाठी वापरला जात आहे. सावरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व संभाजी महाराज यांच्याबद्दल जे लिखाण केले आहे, ते भाजपाला मान्य आहे का? याचं उत्तर द्यावं.” असा थेट सवाल खेरा यांनी केला आहे.
महाविकास आघाडीवरही मांडली भूमिका
सावरकरांच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडीमध्ये फूट पडणार असल्याच्या चर्चांना खेरा यांनी स्पष्टच नाकारलं. “वीर सावरकर मुद्द्यावर महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या आरोपात कसलेही तथ्य नाही, ही आघाडी मजबूत आहे. प्रत्येक पक्षाचे आपले-आपले विचार असतात, प्रत्येकाला विचार मांडण्याचे स्वातंत्र आहे. लोकशाहीत संवाद महत्वाचा असतो, तो संवाद महाविकास आघाडीमध्ये आजही आहे.” असं खेर यांनी सांगितलं.
महापुरुषांवरून वाद थांबेनात तोच… | Savarkar Controversy
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्यावर ओकलेली गरळ ताजी असतानाच, ते कमी म्हणून की काय राहुल गांधी यांनी सावरकरांबाबत वादग्रस्त वक्तव्य केलंय. सत्ताधारी पक्षाकडूनही हा मुद्दा लावून धरण्यात आला असून गौरव यात्रा काढण्याची घोषणा त्यांनी केली आहे. मात्र अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोडलेले कंबरडे, वाढलेली महागाई, रोजगार या सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना लोक व्यक्त करत आहेत.