मुंबई – आयपीएल स्पर्धा भारतात आयोजित करावी, यासाठी बीसीसीआयचे पदाधिकारी प्रयत्नशील असतानाच काही संघ मालकांनी व सदस्यांनी ही स्पर्धा परदेशात घेण्यात यावी, यासाठी फिल्डिंग सुरू केली आहे. यामुळे जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट मंडळात गटातटाचे राजकारण सुरू झाले आहे.
करोनाच्या धोक्यामुळे एप्रिलपासून सुरू होणारी आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली होती. आता श्रीलंका, अमिराती, वेस्ट इंडिज व दक्षिण आफ्रिका या देशांनी ही स्पर्धा आमच्याकडे आयोजित होऊ शकते, असा प्रस्ताव दिला होता. त्यावर आधी कोणताही निर्णय बीसीसीआयने घेतला नव्हता. मात्र, जेव्हा ऑस्ट्रेलियात होत असलेल्या टी-20 विश्वकरंडक स्पर्धेबाबत निर्णय घेण्यासाठी आयसीसीने 10 जून ही तारीख निश्चित केली तेव्हा मात्र बीसीसीआयला जाग आली. करोनामुळे टी-20 विश्वकरंडक रद्द होईल व त्या विंडोमध्ये आयपीएल घेता येईल यासाठी बीसीसीआय प्रयत्न करत असून सदस्य मात्र, निराळीच भूमिका मांडत आहेत.
ही स्पर्धा भारतातच घेतली तर नफा जास्त होईलच त्याचबरोबर विलगीकरणाची अट असल्याने परदेशात गेल्यानंतर सर्वांनाच 14 दिवस विलगीकरणात राहावे लागण्याची शक्यता आहे. अर्थात, बीसीसीआयमध्ये या स्पर्धेच्या आयोजनाबाबत दोन गट पडले असून काही सदस्य भारतात स्पर्धा खेळविण्यासाठी आग्रही आहेत तर, कीही सदस्य परदेशातील स्पर्धेसाठी अनुकूल आहेत. आता बुधवारी आयसीसीच्या बैठकीत टी-20 विश्वकरंडकाबाबत काय निर्णय होईल त्यावर आयपीएलचेही भवितव्य अवलंबून राहणार आहे.