नगर – अतिक्रमणे काढण्यासाठी गेलेल्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. बोल्हेगाव येथील अतिक्रमणांसंदर्भात कारवाई करण्यासाठी पथक गेले होते. मात्र, येथे जोरदार गदारोळ झाला. अखेर अतिक्रमणे काढण्यासाठी चार दिवसांची मुदत देत महापालिकेचे पथक माघारी फिरले.
बोल्हेगाव, गांधीनगर येथील काही रहिवासी अतिक्रमणांविरोधात 1 मे पासून महापालिकेत ठिय्या आंदोलन करत आहेत. मागील चार दिवसांपासून या रहिवाशांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. त्यानंतर मनपा आयुक्तांच्या आदेशानुसार आज मनपा अतिक्रमण विरोधी पथकाने येथील अतिक्रमणे हटविण्याचे नियोजन केले होते. पथकाने पोलीस बंदोबस्त घेऊन अतिक्रमण ठिकाणी दाखल झाले. पथक येताच येथील नागरिकांनी जोरदार विरोध करण्यास सुरूवात केली. काही वेळातच नागरिकांची मोठी गर्दी जमा झाली. त्यामुळे वातावरण तणावपूर्ण बनले होते. परिस्थिती हाताळण्यासाठी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त मागविण्यात आला होता.
काही जण जेसीबीला आडवे आले. कारवाईला विरोध केला. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. सरकारी जागेवरील अतिक्रमण हटविण्यासाठी कोणतीही नोटीस देण्याची गरज नसते. अतिक्रमण कधीही काढता येते, असे पथकातील अधिकारी जमावातील लोकांना समजावून सांगत होते. मात्र, कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. जवळपास दोन तास हा वाद सुरूच होता. घटनेची माहिती समजताच शिवसेनेचे माजी शहरप्रमुख दिलीप सातपुते, नगरसेवक बाळासाहेब बोराटे, योगीराज गाडे, अभिषेक कळमकर घटनास्थळी आले. सदर जागा खासगी असून अतिक्रमणे असून त्यावरील अतिक्रमणे काढू नयेत, असे त्यांनी सांगितले.
तरीही हा वाद सुरूच होता. अखेर पथकाकडून संबंधितांना अतिक्रमणे काढून घेण्यासाठी चार दिवसांची मुदत देण्यात आली. या मुदतीत अतिक्रमणे काढली नाहीत तर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला. त्यानंतर अतिक्रमण विरोधी पथक कारवाई न करताच माघारी परतले.