नवी दिल्ली : सामाजिक कार्यकर्ते तपन बोस यांनी भारतीय लष्कराबाबत वादग्रस्त विधान केले आहे. भारतीय लष्कर आणि पाकिस्तानी लष्कर एकसारखेच आहे. या दोन्ही देशांच्या लष्करांमध्ये कोणताही फरक नाही. दोन्हीकडचे जवान आपल्याच लोकांना मारतात, असे वादग्रस्त विधान शांतता चळवळीचे कार्यकर्ते आणि माहितीपट निर्माते तपन बोस यांनी केले आहे.
दिल्लीतील जंतर-मंतर मैदानावर सीएए आणि एनआरसी विरोधी आंदोलनादरम्यान ते बोलत होते. बोस म्हणाले, पाकिस्तान हे आपले शत्रू राष्ट्र नाही. भारत आणि पाकिस्तानातील सत्ताधारी वर्गही एकसारखेच आहेत. त्यामुळे आपले आणि त्यांचे लष्करही सारखेच आहे. त्यांचे सैनिक त्यांच्याच लोकांना मारतात. तसेच आपले जवानही आपल्याच लोकांना मारतात. त्यामुळे त्यांच्यात कोणताच फरक नाही.
युरोपियन संघाच्या संसदेत पाकिस्तानी वंशाचे खासदार शफाक मोहम्मद यांनी सीएएविरोधात ठराव मांडला आहे. आज हा ठराव तेथील संसंदेच्या पटलावर मांडण्यात येणार आहे. यापार्श्वभूमीवर बोस यांनी हे विधान केले आहे.
दरम्यान, तपन बोस यांच्या या विधानावर सोशल मीडियातूनही अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत. बोस यांच्या या विधानाबाबत नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली असून हे वक्तव्य भारतीय लष्कराचा अपमान करणारे असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.