किशोर तिवारींचे भैय्याजी जोशी यांना पत्र
मुंबई : माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच चर्चेत असतात. आपल्या सोशल मीडियावरुन त्या राजकीय कोट्या देखील करत असतात. यावरुन बऱ्याचदा त्या ट्रोल देखील होतात. मात्र आता अमृता फडणवीस यांना आवरा, अशा आशयाचे पत्र वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांनी संघाचे सहकार्यवाह भैय्याजी जोशी यांना लिहिले आहे.
अमृता फडणवीस या जर असेच संबंध वाईट करत राहिल्या, तर देवेंद्र फडणवीस कसे मुख्यमंत्री होतील, असे त्यांनी पत्रात म्हटले आहे. सोबतच तिवारी यांनी अगदी जशोदाबेन, रश्मी ठाकरे, कांचन गडकरी, शर्मिला ठाकरे ह्यांच्या वागण्याचे दाखले दिले आहेत.
कोषातल्या रेशीम किड्याशी तुलना करत अमृता फडणवीसांनी आदित्य ठाकरेंवर टीका केली होती. तसेच याआधी अनेक वेळा देवेंद्र फडणवीसांची बाजू घेण्यासाठी अमृता फडणवीसांनी विरोधकांवर, विशेषतः शिवसेनेवर टिप्पणी करत राजकीय वादात उडी घेतली. या मुद्याला हात घालत किशोर तिवारींनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला पत्र पाठवून त्यांना आवरण्याची विनंती केली आहे. त्यासाठी किशोर तिवारींनी भाजपातल्या ज्येष्ठ नेत्यांच्या जोडीदाराच्या आदर्श वर्तनाची आठवण करुन दिली आहे.