पुणे – लॉकडाऊनमुळे राज्यातील विविध शहरात मोठ्या संख्येने विद्यार्थी, नागरिक अडकून पडले आहेत. या नागरिकांना प्रवासासाठी महामंडळाने एक नियमावली ठरवली असून, एसटीच्या प्रत्येक विभागीय कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात यावा, अशा सूचना महामंडळाने दिल्या आहेत.
लॉकडाऊनमुळे नागरिकांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्याची परवानगी आता राज्य सरकारने दिली आहे. राज्यातील वाहतुकीची व्यवस्था राज्य मार्ग परिवहन महामंडळातर्फे (एसटी) केली जाणार आहे. त्यासाठी एसटीच्या दहा हजार बसचा ताफा सज्ज ठेवण्यात आल्या आहे. प्रवास करताना या नागरिकांना प्रशासनाच्या सर्व अटी व शर्तींचे पालन करावे लागणार आहे. तसेच, सरकारने संबंधित प्रवासास परवानगी दिल्याबाबत सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
प्रवासादरम्यान मास्क बंधनकारक करण्यात आले असून नागरिकांना बसच्या प्रवासमार्गाचे सुरवातीचे ठिकाण ते शेवटचे ठिकाण अशाच प्रवासास परवानगी दिली जाणार आहे. त्यांना मार्गातील मधल्या थांब्यावर उतरता येणार नाही. अशा सूचना महामंडळाचे महाव्यवस्थापक (वाहतूक) राहूल तोरो यांनी सर्व विभागीय कार्यालयांना दिल्या आहेत.