इंद्रायणीनगर – पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीमध्ये विविध विकासकामे सुरू आहेत. परंतु महापालिकेकडील बहुतांश ठेकेदार त्यांच्याकडे काम करणाऱ्या कामगारांना सुरक्षा साधने पुरवत नाहीत. त्यामुळे ठेकेदारांकडे काम करणारे बहुतांश कामगार जिवावर उदार होऊन सुरक्षासाधनांशिवाय कामे करत आहेत. परंतु लाखो रुपयांचे टेंडर भरून काम मिळविणारे ठेकेदार मात्र कामगारांच्या सुरक्षेकडे कानाडोळा करत असताना महापालिका प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे. त्यामुळे कामगाराला अपघात घडल्यास याला जबाबदार कोण, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
भोसरी परिसरात ड्रेनेजलाइन दुरुस्तीचे काम सुरू आहे. परंतु हे काम घेतलेल्या ठेकेदाराने आपल्या कामगारांना सुरक्षासाधने न पुरविल्याने जिवावर उदार होऊन कामगार कामे करत आहेत. सुरक्षा साधनांशिवाय काम करतानाचे कामगारांचे चित्र शहरात सर्रास पहावयास मिळते. दोन दिवसांपूर्वी इंद्रायणीनगर परिसरातील सेक्टर एकमधील संतनगर चौकाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील चेंबरची दुरुस्ती करण्यात आली. साधारण चार फूट खोल असलेल्या चेंबरमध्ये कामगार बसून काम करीत होते. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या वाहनधारकांना कुठल्याही प्रकारची माहिती नसल्याने तारांबळ उडत होती. काम करताना कुठल्याही प्रकारचे सुरक्षा साधने कंत्राटदार देत नसल्याचे कामगारांनी सांगितले.
अपघाताचा धोका
इंद्रायणीनगरमधील संतनगर चौकात वाहनांची मोठी वर्दळ असते. या रस्त्यावर औद्योगिक आस्थापना, आरटीओ कार्यालय असल्यामुळे जड वाहने तसेच सार्वजनिक वाहनांची सारखी वर्दळ असते. दुभाजकाचे होणारे रंगकाम व दुरुस्ती, दुभाजकांमधील झाडांची कटई, रस्त्याच्या मधोमध असलेले चेंबर, उंचावरील कामे अशी अनेक प्रकारची कामे महापालिकेच्या संबंधित विभागाकडून करून घेतली जातात. मात्र कामगारांच्या सुरक्षेची काळजी घेणे, कामगारांना सुरक्षा साहित्ये पुरविणे, ही संबंधित विभागाच्या सुरक्षा अधिकाऱ्यांची व काम घेणाऱ्या कंत्राटदाराची जबाबदारी असताना यांनी मात्र सोयीस्कररित्या सुरक्षा नियमांकडे पाठ फिरविल्याचे दिसते.
नियमांची होतेय पायमल्ली
महापालिका प्रशासनाने बनविलेले कामगार कायदे व सुरक्षा नियमावली ठेकेदारांकडून धाब्यावर बसविली जात आहे. असे सर्रास चित्र शहरात सुरू असलेल्या अनेक विकासकामे सुरू असताना प्रकर्षाने दिसून येते. मात्र या विरोधात अशिक्षित कामगारांनी आवाज उठविल्यास कामगारांना कामावरून कमी करण्याची शक्यता जास्त असते. यामुळे कामगारांना व त्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्याचे काम फक्त कागदावरच राहिल्याचे वास्तव कुणीही नाकारू शकत नाही.
रंगकाम करणारांची सुरक्षा रामभरोसे
भोसरी परिसरातील राजमाता जिजाऊ उड्डाणपुलाखाली असलेल्या लोखंडी बॅरिकेडची रंगरंगोटी सुरू आहे. मात्र रस्त्यावरून भरधाव वाहणाऱ्या वाहनांच्या गर्दीत कुठलेही सुरक्षासाधनांचा वापर न करता जीवावर उदार होऊन कामगार रंगकाम करतानाची वास्तव परिस्थिती आहे. लाखोची बिले उकळणारे कंत्राटदार व सुस्त महापालिका प्रशासनाला सुद्धा कामगारांच्या सुरक्षिततेबाबत गांभीर्य नसल्याचे दिसते. त्यामुळे उद्या कुठलीही अनुचित घटना घडल्यास घटनेची जबाबदारी घेणार कोण? हा प्रश्न मात्र अनुत्तरीतच आहे.