मोदींना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केली चिंता
कोलकता : पश्चिम बंगालला मिळणाऱ्या केंद्रीय निधीत सातत्याने कपात होत आहे. त्याशिवाय, तो निधी मिळण्यातही विलंब होत आहे, अशी चिंता त्या राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली आहे. त्याविषयीचे पत्र त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठवले आहे.
केंद्रीय निधीतील 50 हजार कोटी रूपयांचा वाटा अजूनही पश्चिम बंगालला मिळाला नसल्याकडे ममता यांनी लक्ष वेधले आहे. राज्याच्या कल्याणाविषयीची कर्तव्यपूर्ती करताना अडथळे येत असल्याचे म्हणत त्यांनी केंद्रीय निधीबाबतच्या स्थितीला असामान्य म्हटले आहे.
केंद्रीय निधीत कपात आणि विलंब अशी स्थिती असूनही पश्चिम बंगाल चांगली कामगिरी करत आहे. राष्ट्रीय विकास दर 2019-20 या आर्थिक वर्षात 5 टक्के इतका राहिला. तर आमच्या राज्याने 10 टक्क्यांहून अधिक विकास दर नोंदवला, असा दावाही ममतांनी केला आहे. ममतांच्या नेतृत्वाखालील तृणमूल कॉंग्रेस सरकारचा मोदी सरकारबरोबरचा संघर्ष वारंवार उघड झाला आहे. आता केंद्रीय निधीच्या मुद्द्यावरून ममता आक्रमक पवित्रा स्वीकारणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.