डॉ. यू राजाबाबू : भारतीय संशोधन संस्थांसमोरील हे मोठे आव्हान
पुणे –“अंतराळयुद्ध हे सध्या सर्वाधिक चर्चेत असलेला युद्धप्रकार आहे. अंतराळात स्वत:चे वर्चस्व स्थापित करण्यासाठी अनेक देशांमध्ये चढाओढ सुरू आहे. त्यातूनच मिसाइल युद्ध सुरू झाले असून नेटवर्किंगच्या माध्यमातून शत्रू राष्ट्रावर एकाचवेळी वेगवेगळ्या प्रदेशातून क्षेपणास्त्रांचा मारा केला जाऊ शकतो. अशा स्थितीत या मिसाइलची लवकरात लवकर पूर्वसूचना मिळणे आवश्यक आहे. त्यामुळेच भारतीय संशोधन संस्थांपुढे मिसाइल्सची लवकरात लवकर पूर्वसूचना देणारे सेन्सॉर विकसित करण्याच्या दिशेने काम सुरू आहे,’ अशी माहिती संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेचे (डीआरडीओ) वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. यू राजाबाबू यांनी दिली.
एका कार्यक्रमानिमित्त पुण्यात आले असता डॉ. राजाबाबू यांनी ही माहिती दिली. राजाबाबू म्हणाले, “मिशन शक्तीच्या यशाने भारताने मिसाईल भेदक क्षमता सिद्ध केली आहे. मात्र, शत्रूदेशाकडून मारा करण्यात आलेल्या मिसाईल्सची लवकरात लवकर पूर्वसूचना मिळणे अत्यावश्यक असते. विशेषत: ज्याठिकाणी मायक्रोसेकंद वर सगळी गणिते अवलंबून असतात, अशाठिकाणी जास्त सतर्कता बाळगणे आवश्यक असते.
त्यामुळेच अद्ययावत गणिती क्षमतांचा (अल्गोरिदमस) वापर करून अत्याधुनिक सेन्सॉरची निर्मिती करणे ही काळाची गरज आहे. तसेच ते भारतीय संशोधन संस्थासमोरील मोठे आव्हानही आहे.’ त्यापाठोपाठ एकाचवेळी अनेक क्षेपणास्त्रांचा मारा झाल्यानंतर सर्वाधिक नुकसानदायी क्षेपनास्त्राची ओळख करून ते तातडीने नष्ट करणारी वेगवान यंत्रणा विकसित करण्याच्या दिशेनेही शास्त्रज्ञ काम करत आहेत. येत्या काही वर्षांत भारतीय संशोधक यासंदर्भात निश्चितच चांगली कामगिरी करतील असा विश्वास डॉ. राजाबाबू यांनी व्यक्त केला.