आजपासून शुद्ध पाणीपुरवठा : पाठे
पाटाचे पाणी घेतल्याने काही दिवस शहराच्या विविध भागात दूषित पाणीपुरवठा झाला. परंतु आजपासून शहराच्या सर्वच भागांमध्ये शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीतपणे सुरू होईल, अशी माहिती पाणीपुरवठा अधिकारी प्रशांत पाठे यांनी दिली.
श्रीरामपूर – शहरातील विविध प्रभागांमध्ये दूषित पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे अनेक नागरिकांना पोटाचे विकार सुरू झाले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
पावसामुळे शहरात अनेक ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्याने पाणीपुरवठा करणाऱ्या मेनलाइन लिकेजचे प्रमाण वाढल्याने दूषित पाणीपुरवठा होत आहे की, पालिकेच्या पाणी फिल्टरमध्ये बिघाड झाला आहे, असे प्रश्न नागरिक विचारू लागले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पहावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
परतीच्या पावसाने रस्त्यावर तसेच अन्य सखल भागामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचून त्या भागाला गटारीचे स्वरुप आले आहे. स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या लाइन देखील त्याच भागातून गेलेल्या असल्याने अनेक भागांत गढूळ पाणी पुरवठा होत आहे. या पाण्याला दुर्गंधी येत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे आरोग्याच्या तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. पालिकेने शुध्द पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
शहरातील मोरगेवस्ती, नॉर्दनब्रॅंच परिसर, वॉर्ड नं 2 चा परिसर, साखर कामगार हॉस्पिटलच्या परिसराबरोबर शहरात इतरही ठिकाणी तीन ते चार दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. या पाण्यामुळे लहान बालकांना मळमळ, काहींना उलटीचा त्रास झाला. तर मोठ्या माणसांना पोटाच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत.
मोरगेवस्ती परिसरातील अनेक नागरिकांनी या भागात तीन ते चार दिवसांपासून दुर्गंधीयुक्त दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याचे सांगितले. यामुळे पाणी रोज भरण्याऐवजी दिवसाआड भरून तुरटी फिरवून ते वापरावे लागत आहे. याबाबत स्थानिक नगरसेवकांना कल्पना दिली. मात्र अद्याप दूषित पाणी पुरवठा सुरू असल्याचे नागरिकांनी सांगितले. तरी नागरपालिकेने शहरातील विविध भागात शुध्द पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
तीन दिवसांपासून पाण्याची चव बदलली
नगराध्यक्षा कुणाकडेही चार्ज न देता फॉरेनला गेल्या होत्या. शहरातील पाणीपुरवठ्याबरोबर इतरही प्रश्नांची वाट लागली आहे. रस्त्यांचे बारा वाजले आहेत. रस्त्यांवर सिलकोट न मारल्यामुळे रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पाण्याच्या चवीत बदल झाला आहे, असा आरोप विरोधी गटाचे नगरसेवक श्रीनिवास बिहाणी यांनी केला आहे.