पणन संचालकाची टॅंकर संस्था : नागरिकांचे आरोग्य धोक्यात
जामखेड – जामखेड शहरासह तालुक्याला टॅंकरद्वारे अक्षरशः दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थेकडून निश्चित केलेल्या उद्भवाच्या ठिकाणी टॅंकर न भरता शहरातील विंचरणा नदीपात्रातून वाहणारे सांडपाणीच टॅंकरमध्ये भरण्यात येत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे.
याबाबत सदाफुले वस्तीमधील नागरिकांनी तहसीलदारांना निवेदन दिले असून टॅंकरने पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थेवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. ही टॅंकर संस्था पणन संचालक व नगरसेवक डॉ. ज्ञानेश्वर झेंडे यांची असून ते सत्ताधारी भाजपचे जबाबदार पदाधिकारी आहे.
जामखेड शहर व तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती पाहता पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. शासनाकडून पाणीपुरवठ्यावर कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे. परंतु जनतेची तहान भागवायचे तर लांबच उलट त्यांच्याच जिवाशी खेळण्याचे काम टॅंकरने पाणीपुरवठा करणारी संस्था करीत आहे.
टॅंकर मोहरी येथील तलावाच्या उद्भवातून भरण्याचे आदेश या संस्थेला देण्यात आले आहे. परंतु मोहरी तलावातून टॅंकर न भरता जेथे पाणी उपलब्ध होईल. तेथे टॅंकर भरण्यात येणार आहे. जामखेड शहरातील सदाफुलेनगर परिसरातील बीएसएनएल टॉवरच्या पुढे विटभट्टी भागातील विंचरना नदीपात्रात जामखेड शहराचे सांडपाणी अडवून जवळच कृत्रिम झरा करून ते दूषित पाणी उपसा करून टॅंकरमध्ये भरण्यात येणार आहे. हे पाणी गावोगावी वितरित करण्यात येत आहे. या दूषित पाण्यामुळे विविध आजाराच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. त्यात पोट व त्वचा आणि घशाचे आजारासह अन्य आजार आढळून आले आहे. या पाण्यामुळे जिवितहानी होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे कोणीच लक्ष देत नाही. नगरपालिकेला याबाबत महिती देवून कोणतीही कारवाई होत नाही.
पाण्याचा वास येणे, पाण्यात फेस येणे, आणि दोन तीन दिवसात पाण्यात आळ्या होतात हे कश्यामुळे होते तर केवळ डबल पैसे कमविण्यासाठी व डिझेल वाचविण्यासाठी टॅंकर पाणी वाटप संस्था गरीब जनतेच्या जिवाशी खेळण्याचे काम करीत आहे. त्याची चौकशी होऊन कारवाई करण्यात यावी. दररोज 20 ते 30 टॅंकर हे दूषित पाणी उपसा करून गावोगावी वाटप केले जात आहे. जनतेसाठी मोठ मोठ्या गप्पा मारणारे जनतेलाच स्वच्छ पाणीपुरवठा करू शकत नाही. ही खुप मोठी शोकांतिका आहे. टॅंकरद्वारे दूषित पाणीपुरवठा करणाऱ्या संस्थेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. सत्तेचा वापर करून ही संस्था प्रशासनावर दबाव टाकत असल्याने कोणीही कारवाई करण्यास धजावत नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांना गप्प बसावे लागत आहे. या संस्थेचे संचालक पालकमंत्र्यांचे निकटवर्तीय असल्याने प्रशासन केवळ बघ्याची भूमिका घेत आहे.
नागरिकांचा आंदोलनाचा इशारा
शहरात होणाऱ्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत नगरपालिकेचे पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागाचे अधिकारी गिते यांना संतप्त नागरिकांनी चांगलेच धारेवर धरले. अनेक वेळा प्रशासनाला लेखी कळवून देखील काहीच कार्यवाही करण्यात आली नाही. आमच्या मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात आंदोलन करण्यात येईल असा इशारा सदाफुलेनगर विकास कृती समिती वतीने देण्यात आला.