मुंबई – राज्यातील मजुरांना घरी जाण्यासाठी अधिकच्या रेल्वेगाड्या मिळाव्यात, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली, पण ट्रेन उपलब्ध होत नाहीत. लॉकडाऊन जाहीर केला त्यावेळीच मुख्यमंत्र्यांनी रेल्वेची मागणी केली होती. त्यानंतर पुन्हा तीन वेळा लेखी मागणी केली. तसेच शरद पवार रेल्वेमंत्री पियुष गोयल यांच्याशी चर्चा केली आहे, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी दिली. तसेच मुंबईत अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेन मिळावी यासंदर्भात निर्णय करणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील बैठकीत महाराष्ट्रातील करोनाच्या परिस्थितीचा आढावा घेतला. ही बैठक मुंबईतील बाळासाहेब ठाकरे स्मारकात झाली. विशेषतः मुंबई, ठाण्यात काय उपाययोजना केल्या यावर चर्चा झाली, अशी माहिती जयंत पाटील यांनी दिली. याशिवाय कर्जमाफीबद्दल शेतकऱ्यांना दिलेली कमिटमेंट सरकार पाळणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.