श्रीहरीकोटा – चंद्रावर अंतराळ उतरवण्याच्या महत्त्वाकांक्षी “चांद्रयान-2’मोहिमेचे “विक्रम’ लॅंडर चंद्रावर उतरवण्याच्या काही मिनिटे आगोदर काही तांत्रिक अडचणी आल्या. त्यामुळे “विक्रम’ लॅंडरकडून सिग्नल पाठवले जाणे थांबवले गेले. नियोजित वेळेच्या काही मिनिटे अगोदरपासून “विक्रम’ लॅंडरची स्थिती काय आहे, हे श्रीहरीकोटा येथील शास्त्रज्ञांना समजू शकले नव्हते.
बराच काळ या सिग्नलची वाट बघितल्यानंतरही लॅंडरची सद्यस्थिती काय आहे, याबाबतची उत्सुकता कायम राहिली. नियोजित वेळेपर्यंत “विक्रम’ लॅंडरचा प्रवास योग्य दिशेने झाला होता. मात्र, अखेरच्या मिनिटांमध्ये लॅंडरला काय अडचणी आल्या हे समजू न शकल्यामुळे शास्त्रज्ञ, खगोल अभ्यासक आणि समस्त देशवासियांचे चंद्रावर यान उतरवण्याच्या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्याचे स्वप्न अर्धवटच राहिले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी या क्षणी श्रीहरीकोटा परिसरातच उपस्थित होते. “इस्रो’चे प्रमुख के. सिवन यांनी संपर्क तुटल्याचे जाहीर केल्यावर पंतप्रधान मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचे मनोधैर्य उंचावण्यासाठी त्यांचे केलेल्या परिश्रमांबद्दल अभिनंदन केले. तसेच सर्व देशवासीय शास्त्रज्ञांच्या पाठीशी असल्याचे सांगितले.