राहुरी – दुर्दैवाने शिकलेली माणसे आर्थिक व्यवहार करताना अधिक प्रमाणावर फसत आहेत. त्या मानाने अडाणी माणसे विचारपूर्वक व्यवहार करीत आहेत. इंटरनेटच्या जमान्यात ऑनलाइन खरेदी व्यवहार वाढले आहेत. तसेच त्या व्यवहारातील फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. ग्राहकांनी अधिक दक्ष राहण्याची गरज आहे, असे प्रतिपादन लोकनेते रामदास पाटील धुमाळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजीराव पठारे यांनी व्यक्त केले.
राहुरी तालुका ग्राहक पंचायत व तहसील कार्यालय राहुरी यांच्या वतीने जागतिक ग्राहक दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. नायब तहसीलदार छाया चौधरी अध्यक्षस्थानी होत्या. प्राचार्य डॉ. पठारे म्हणाले, प्रत्येक व्यक्ती ग्राहक आहे. जन्मापासून ते मृत्यूपर्यंत ग्राहक आहे. ग्राहकांनी हक्काप्रमाणे कर्तव्याबाबतीत देखील जागरूक राहिले पाहिजे. खरेदी केलेल्या मालाची पावती घेतली पाहिजे. मालाचा दर्जा व किंमत याबाबत जागरुक असले पाहिजे. फसवणूक झाल्यास यंत्रणांकडे दाद मागितली पाहिजे.
छाया चौधरी म्हणाल्या, ग्राहकांनी संघटित होणे ही काळाची गरज आहे. दिवसेंदिवस ग्राहक हक्कांबाबत जागरूक होत आहेत. ही चांगली गोष्ट आहे. संबंधित यंत्रणांकडे ग्राहकांनी वेळीच तक्रारी केल्या पाहिजेत तरच त्यांना न्याय मिळू शकतो. यावेळी आयोजित वक्तृत्व स्पर्धेत श्रेयस औटी, ऋषीकेश पवार, नंदीनी गोंधळे तर निबंध स्पर्धेत काजल भुजाडी, निकिता भिंगारकर व स्नेहल सुरवसे यांनी बक्षिसे मिळविली.
स्पर्धेचे परीक्षक म्हणून उपप्राचार्य डॉ. सुर्यकांत गडकरी व बाळासाहेब डोंगरे, निबंध स्पर्धेचे परीक्षक म्हणून प्रा. महेश शेळके व प्रा. रंगनाथ खिलारी यांनी काम पाहिले. सुचेता कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. नायब तहसीलदार डमाळे, लता कांबळे, मनीषा पोटे, श्रीनिवास सहदेव, शैला क्षीरसागर आदी यावेळी उपस्थित होते. ऋषिकेश येवले, प्रा. पोपटराव जगदाळे उपस्थित होते.