नवी दिल्ली – केंद्रीय ग्राहक संरक्षण अधिकारीनी या संस्थेने ई-दाखील नावाचे पोर्टल सुरू केले आहे. त्यामुळे ग्राहकांना खरेदी केलेल्या वस्तू खराब निघाल्यास लवकर न्याय मिळण्यास मदत होत आहे. अलिगड मधील एका ग्राहकाने साड्या खरेदी केल्या होत्या. मात्र त्या खराब निघाल्यानंतर या ग्राहकाला 16 हजार 990 रुपये परत मिळाले.
चंदीगडमधील एका ग्राहकाने 1529 रुपयाचे दोन तवे खरेदी केले होते. ते खराब निघाल्यानंतर त्या ग्राहकाने ई-दाखील वेबसाइटवर तक्रार नोंदविल्यानंतर त्यांना ते पैसे परत मिळाले. बंगळुरूमध्ये एका विद्यार्थ्याने 48 हजार 658 रुपये शुल्क भरूनही खराब व्यवस्थेमुळे त्याला तो कोर्स पूर्ण करता आला नाही. या विद्यार्थ्यांचे ते पैसे परत मिळाले. अशा प्रकारच्या 213 प्रकरणाचा निवाडा ई-दाखील वेबसाईट सुरू झाल्यापासून करण्यात आला असल्याचे अधिकारिणीच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले.
या यंत्रणेचा वापर करण्यात दिल्ली आणि महाराष्ट्र आघाडीवर आहेत. देशातील ग्राहकांनी या व्यवस्थेचा फायदा घेऊन न्याय मिळवावा असे त्यांनी सांगितले. तक्रार दाखल करण्यासाठी ग्राहकांना प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची गरज नाही. ग्राहक ई-नोटीस पाठवू शकतात आणि त्यांच्या तक्रारीच्या पुराव्यासाठी कागदपत्रे अपलोड करू शकतात.
त्याचबरोबर वर्च्युवल हेअरिंगमध्ये उपस्थित राहू शकतात. या संदर्भात केल्या जात असलेल्या पाठपुराव्याची माहिती एसएमएस व ई-मेलच्या माध्यमातून पाठविली जाते. देशातील 19 राज्यात ही यंत्रणा लागू आहे. जिल्ह्या स्तरावरील तक्रारीचा निकाल 100 दिवसात तर राज्य स्तरावरील तक्रारीचा निकाल नव्वद दिवसात लागतो.