खटावमधील महावितरण कार्यालयाला शास्त्रीनगर भागातील ग्रामस्थांचे निवेदन
खटाव – येथील शास्त्रीनगर (खटाव) भागातील संतप्त नागरिकांनी खटावमधील महावितरण कार्यालयात पुरेसा व उच्च दाबाने वीज पुरवठा होण्यासाठी निवेदन दिले. खटाव परिसरात कमी-जास्त दाबाने वीज पुरवठा होत असल्याने वीजेवर चालणारे कोणतेही उपकरण व्यवस्थितरित्या चालत नाही. उपकरणामध्ये बिघाड होण्याचे प्रमाण वाढले आहे. उन्हाळ्यामुळे उन्हाची तीव्रताही वाढत आहे. सध्या परिसरात दुष्काळ असल्याने पाण्याचा प्रश्न बिकट व भीषण झाला आहे.
वीजेचा दाब व्यवस्थित नसल्याने इलक्ट्रिक उपकरणे, शेतीपंप, बोअरवेल सुस्थितीत चालत नसल्याने व नागरिकांना इतर सोयी सुविधांबरोबर पाण्यासाठी ही भटकंती करण्याची वेळ आली आहे. त्याचबरोबर परिसरामध्ये वीजेवर चालणारे लघु उद्योग ही छोट्या- मोठ्या प्रमाणात चालत असल्याने वीजेचा दाब कमी जास्त होत आहे. त्यामुळे उपकरणे बिघडण्याची शक्यता जास्त वाढली आहे. परिसरात वीजेचा पुरवठा पुरेशा दाबाने करावा असे निवेदन खटावमधील शास्त्रीनगर भागातील नागरिकांनी महावितरण कार्यालयात केले आहे. महावितरणचे खटावमधील मुख्य अधिकारी हजर नसल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना हे निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.