“पीडब्ल्यूडीच्या’ ऍक्शन प्लॅनचे नागरिकांतून स्वागत – दै. प्रभातच्या दणक्याने बांधकाम विभागाला जाग
वाई (प्रतिनिधी) – वाई तालुक्यात रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता, सारीच ठिगळ अशी दयनीय अवस्था झालेल्या वाई तालुक्यातील रस्त्याची पाऊसामुळे अक्षरशः चाळण झाली होती. परतीच्या पावासाने रस्त्यांची दयनीय अवस्था झालेली होती. दै. प्रभातचे त्याबाबतचे वृत्त प्रसिध्द करून याबाबत व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला होता. दै. प्रभातच्या वृत्तानंतर वाई बांधकाम विभागाने तालुक्यातील रस्ते दुरुस्तीच्या कामाला युध्दपातळीवर सुरुवात केली असून येणाऱ्या पंधरा दिवसांत वाई तालुक्यातील रस्ते खड्डे मुक्त करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्रीपाद जाधव यांनी दै. प्रभातसाठी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.
—
पत्रकात असेही म्हटले आहे, उखडलेल्या रस्त्यावर स्थानिक नागरिकांसह वाहन चालकांना त्रास सहन करावा लागत होता. यामुळे तालुक्यातील जनतेचा रोष वाढला गेला होता. या पार्श्वभूमीवर वाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने “खड्डे मुक्त’ रस्त्यासाठी कंबर कसली असून पंधरा मुख्य मार्गासह अन्य रस्त्यावरील सर्व खड्डे भरून घेण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्याची अंमलबजावणी गेल्या चार दिवसांपासून सुरू झाली असून या मोहिमेचे तालुक्यातील नागरिकांतून स्वागत केले आहे.
लाखो पर्यटक दरवर्षी पाचगणी, महाबळेश्वरला येत असतात.
सुरूर – वाई या राज्य महामार्गावरून दररोज हजारो वाहने पसरणी घाटातून पाचगणी, महाबळेश्वरकडे जातात. मात्र पाऊसाचा परतीचा प्रवास लांबल्याने व महिन्याभर पावसाने अक्षरशः झोडपून काढल्याने शेती व रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती. रस्ते उखडले गेले होते. मोठ-मोठ्या खड्ड्यांनी रस्त्याची अवस्था बिकट झाली होती. लहान- मोठी वाहनं या खड्ड्यात जोरात आपटली जात होती. काही वेळेस अचानक ब्रेक दाबल्याने वाहने एकमेकांवर आदळून व दुचाकी घसरून अनेक अपघात या रस्त्यावर झाले आहेत. अनेकांना जीव गमवावा लागला आहे तर अनेकजण कायमचे जायबंदी झाले आहेत.
नवीन वाहने या रस्त्यांमुळे खिळखिळी झाली. यामुळे रस्ते खड्डेमुक्त करण्याची मागणी केली जात होती. रस्त्याच्या दुरावस्थेचा सर्व रोष सार्वजनिक बांधकाम विभागावर काढला जात होता. यामुळे तात्काळ रस्ते दुरूस्तीची जबाबदारी बांधकाम विभागाची वाढली होती. या सगळ्या पार्श्वभूमीवर वाईच्या सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता श्रीपाद जाधव व त्यांची सर्व टीम यांनी पंधरा दिवसात सुरूर ते वाई, वाई ते पाचवड, तसेच पश्चिम भागाला जोडणारा वाई ते धोम या मुख्य व सर्वाधिक वर्दळ असलेल्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी युध्दपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. सर्व आवश्यक साधन सामग्री, पुरेशा कर्मचारी वर्ग, यासाठी झटत आहे.
येणाऱ्या पंधरा दिवसात सुरूर- वाई व वाई ते पसरणी या मुख्य मार्गावरील ऐंशी ट्क्के खडी व डांबराने बुजवले जाणार असून त्यावरुन रोलर फिरवला जाणार असल्याने रस्ते चकाचक खड्डे मुक्त होणार आहेत. खड्ड्यामुळे हैराण झालेल्या पर्यटक व स्थानिक नागरिकांनी बांधकाम विभागाला धन्यवाद दिले आहेत.
पाचगणी, महाबळेश्वरला येणाऱ्या पर्यटकांची संख्या जास्त आहे. परतीच्या पावसाने रस्त्याची अवस्था अतिशय बिकट झाली होती. प्रचंड पावसामुळे खड्डे भरण्यासाठी अडचणी येत असल्याने बांधकाम विभागाचा नाईलाज झाला होता. पाऊस उघडताच खड्डे भरण्याचे काम चालू करण्यात आले असून पाच ते सहा टीम विविध ठिकाणी कार्यरत असून थोड्याच दिवसात वाई तालुक्यातील मुख्य रस्त्यासह अंतर्गत रस्ते खड्डे मुक्त होणार आहेत.
– श्रीपाद जाधव , सहाय्यक अभियंता बांधकाम विभाग, वाई