कोंढवा आणि आंबेगाव सीमाभिंत दुर्घटनाप्रकरणी सीओईपीचा अहवाल
बिल्डर, स्ट्रक्चरल इंजिनिअर काळ्या यादीत
पुणे – कोंढवा येथील “स्टायलस अल्कॉन’ आणि आंबेगाव येथील सिंहगड कॉलेजची सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेतील दोन्ही इमारतींच्या सीमाभिंती मूळ डिझाईननुसार बांधल्या नसल्याचे तसेच त्या कमकुवत असल्याचा अहवाल “सीओईपी’ने दिला आहे. या दोन्ही ठिकाणचे विकसक, स्ट्रक्चरल डिझायनर, लेबर कॉन्ट्रक्टर यांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव आयुक्तांकडे पाठविल्याची माहिती महापालिकेच्या बांधकाम विभागाच्यावतीने देण्यात आली आहे.
आठदिवसांपूर्वी शनिवारी कोंढवा आणि पाठोपाठ सोमवारी आंबेगाव येथे घडलेल्या या दुर्घटनेत 21 मजूर आणि कुटुंबियांचा मृत्यू झाला आहे. कोंढवा येथील “स्टायलस अल्कॉन’ इमारतीच्या सीमाभिंतीची रुंदी आणि स्लोप हा डिझाईन नुसार केलेली नाही. भिंतीची गुणवत्ताही खराब असल्याने संपूर्ण सीमाभिंत उतरवून नव्याने बांधणे गरजेचे आहे. या इमारतीला कुठलाही धोका नाही, असे सीओईपीने दुर्घटनेनंतर केलेल्या तपासणी अहवालामध्ये नमूद केले आहे. तसेच दुर्घटनेनंतर इमारतीच्या सीमाभिंतीचे डिझाईन सीओईपीकडून तयार करून घेतले आहे. त्यानुसार सीमाभिंतीचे काम करायला सांगितले आहे. त्यानुसार काम सुरूही करण्यात आल्याचे अहवालात नमूद केले आहे.
या दुर्घटनेला जबाबदार धरून विकसक जगदीश अगरवाल यांच्यासह संचालक विवेक अगरवाल, विपुल अगरवाल, स्ट्रक्चरल इंजिनिअर, आर्कीटेक्ट सुनील हिंगमिरे, स्ट्रक्चरल इंजिनिअर अकील शेख यांना नोटीस देण्यात आली आहे तसेच त्याचे परवानेही स्थगित करण्यात आले आहेत. त्यांच्याकडून आठ दिवसात स्पष्टीकरण मागवण्यात आले होते. त्यातील आर्कीटेक्ट हिंगमिरे यांनी ते दिले आहे. परंतू त्यांचे स्पष्टीकरण अमान्य करण्यात आले आहे. तर जगदीश अगरवाल आणि अन्य संचालकांनी अद्याप स्पष्टीकरण दिलेले नाही.
याशिवाय लगतच्या कुणाल बिल्डर्सचे हेमेंद्र शहा, पंकज व्होरा आणि गांधी यांच्यासह आर्कीटेक्ट, लेबर कॉन्ट्रॅक्टर, डिझाईन इंजिनिअर यांनी विहीत मुदतीत स्पष्टीकरण दिले नसल्याने या सर्वांना ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव आयुक्तांपुढे ठेवण्यात आला आहे. हिंगमिरे यांच्यासोबत विवेक अगरवाल हे स्टायलस अल्कॉनचे आर्कीटेक्ट आहेत. या दोघांचे परवाने रद्द करण्यासाठी आर्कीटेक्ट असोसिएशनला पत्र पाठविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
सिंहगड कॉलेज सीमाभिंत दुर्घटना
सिंहगड कॉलेजच्या सीमाभिंतीचे काम 10 ते 12 वर्षांपूर्वी करण्यात आले आहे. दगड आणि वीट वापरून केलेल्या या सीमाभिंतीची रुंदी जेमतेम 400 ते 500 मि.मी. दरम्यान आहे. ही भिंत कमी रुंदीची असून, डिझाईननुसार बांधलेली नाही. भिंतीलगत लावलेल्या झाडांची मुळे खोलवर गेली आहेत. तसेच छतावरील पाणी तसेच येथून जाणाऱ्या पावसाळी ड्रेनेजचे पाणी भिंतीतून मुरत असल्याने कमकुवत होवून भिंत पडली आहे. भिंतीचा उर्वरीत भागही धोकादायक झाला असून, तो उतरवून नव्याने भिंत बांधण्याची गरज असल्याचे सीओईपीने दिलेल्या चौकशी अहवालात नमूद करण्यात आले आहे.
याप्रकरणी लगतच्या बांधकाम साईटचे विकसक संतोष उर्फ बाळासाहेब दांगट यांना नोटीस देण्यात आली होती. परंतु त्यांनीही अद्याप खुलासा न केल्याने दांगट यांनाही ब्लॅकलिस्ट करण्याचा प्रस्ताव आयुक्तांपुढे ठेवण्यात आला आहे. सिंहगड कॉलेजवर यापूर्वीच गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या दुर्घटनेत सहा मजुरांचा मृत्यू झाला आहे.
– प्रशांत वाघमारे, शहर अभियंता, पुणे महापालिका.
शहरातील 187 धोकादायक बांधकामांना मागील आठवड्यात नोटीसा देण्यात आल्या आहेत. आठवड्याभरात 34 अतिधोकादायक बांधकामे उतरविण्यात आलेली आहेत. तसेच सीमाभिंतीच्या दुर्घटनेनंतर शहरातील सर्व बांधकामांच्या ठिकाणच्या लेबर कॅम्पची पाहाणी करण्यात आली असून, 36 ठिकाणचे लेबर कॅम्प सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहेत.
बांधकामांवर आर्कीटेक्ट, स्ट्रक्चरल डिझाईनर काम करत असतात. त्यांना महापालिका परवाने देत असते. त्यामुळे बांधकामाच्या ठिकाणी सर्वबाबींची परिपूर्तता करण्याची जबाबदारी ही याच तज्ज्ञांची आणि विकसकाची असते. आर्किटेक्टने सादर केलेल्या डिझाईन आणि रिपोर्टनुसार महापालिका बांधकामांना ऑक्युपन्सी सर्टीफिकेट देते.