मुंबई – विविध कारणामुळे देशातील सात मोठ्या शहरातील सहा लाख घरांचे बांधकाम रखडले असून या घरांची किंमत तब्बल पाच लाख कोटी रुपये इतकी आहे. या घरांच्या योजना 2014 च्या अगोदर जाहीर झाल्या होत्या.
मात्र नंतर परिस्थितीजन्य कारणामुळे नियोजित वेळापत्रकाप्रमाणे या घराचे बांधकाम होऊ शकलेले नाही असे अनारॉक प्रॉपर्टी कन्सल्टंट या संस्थेने म्हटले आहे. त्यातील 1.40 लाख कोटी किमतीची 1.74 लाख घरे आता पुन्हा हे बांधकाम सुरू होणार की नाही या अवस्थेत अडकलेली आहेत. यातील दोन तृतीयांश इतकी घरे 80 लाख रूपयेपेक्षा कमी किमतीची आहेत.
रखडलेल्या घरात पुण्यातील घरांचे प्रमाण आठ टक्के असून या घरांची किंमत 29 हजार 390 कोटी रुपये इतकी आहे.
दिल्ली शहरात 1.13 लाख, मुंबई शहरात 41 हजार 730 इतकी घरी अपूर्णावस्थेत पडून आहेत. उत्तरेतील राज्यापेक्षा दक्षिणेतील राज्यात रखडलेल्या प्रकल्पांचे प्रमाण कमी आहे. हैदराबाद, चेन्नई, बंगलोर या शहरातील रखडलेल्या घरांचे प्रमाण एकूण घरांच्या केवळ 11 टक्के इतके आहे. केंद्र सरकारने या प्रकल्पांना काही प्रमाणात मदत करण्याची योजना जाहीर केली होती. मात्र या योजनेची कशा प्रकारे अंमलबजावणी होत आहे याचा अंदाज अद्याप कोणालाही आलेला नाही.