पुणे – पुण्याची परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत आजच्या परिस्थितीत लॉकडाऊन करणे योग्य नाही, अशी भूमिका महापौर मुरलीधर मोहोळ यांनी मांडली.
आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी लॉकडाऊनचे संकेत देत याबाबत मुख्यमंत्र्यांशी होणाऱ्या बैठकीत निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. त्या पार्श्वभूमीवर सध्याच्या काळात लॉकडाऊन सुसंगत पर्याय नसल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.
पुण्यात आणि एकूणच राज्यामधील रुग्णसंख्या वेगाने वाढत आहे. राज्यात ऍक्टिव्ह रुग्णांबाबत पुणे गेल्या कित्येक दिवसांपासून आघाडीवर असून, सुमारे तीस हजारांपेक्षा जास्त रुग्ण ऍक्टिव्ह आहेत. बाधितांची संख्या आता दररोज तीन हजारांपेक्षा जास्त आहे. त्या पार्श्वभूमीवर टोपे यांनी लॉकडाऊनची शक्यता व्यक्त केली होती.
पुण्याची परिस्थिती नियंत्रणात आहे. त्यामुळे आजच्या स्थितीत पूर्णपणे लॉकडाऊन करणे योग्य नाही. रुग्णांची संख्या पाहता सध्या असलेल्या निर्बंधांची कडक अंमलबजावणी आवश्यक आहे किंवा त्यापेक्षा अधिक कडक निर्बंध लावून त्याची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाई करणे, हे ते उपाय असू शकतात, याकडे त्यांनी लक्ष वेधले. काही दिवसांपूर्वी “टाटा रिसर्च सेंटर’ आणि “आयसर’च्या पाहणीतही हेच निष्कर्ष निघाले होते. त्यामुळे लॉकडाऊन हा त्यावरचा उपाय नाही, असे मोहोळ म्हणाले.
प्रशासन म्हणून आपण तीन आघाडींवर काम करू शकतो. सक्षम आरोग्य यंत्रणा उभी करणे, बेडची उपलब्धता, व्यापक आणि वेगाने लसीकरण, जास्तीत जास्त संशयितांच्या चाचण्या असे त्याचे स्वरूप आहे , असे मोहोळ म्हणाले.